पणजी : राज्यातील उच्च माध्यमिकमध्ये अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. चांगल्या निकालाची परंपरा असणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयांत प्रवेशासाठी विद्यार्थी प्रयत्नरत आहेत. तसेच इच्छुक शाखेतील अपुऱ्या जागांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. यामुळे राजधानीतही काही ठरावीक विद्यालयांत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यालये सुरू झाली तरी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. राज्यात शाखानिहाय ठरावीक उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. तेथील शाखांच्या जागा मर्यादित असतात. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाही. त्यासाठी ८0-८५ टक्क्यांच्या वर गुण मिळणे आवश्यक बनले आहे. काही उच्च माध्यमिक विद्यालयांत तर ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येतो. नाव उघड न करण्याच्या अटीवर एका प्राचार्याने सांगितले, हल्ली शिक्षणाबाबत पालक आणि मुलांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ज्या शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर सहजतेने पुढील शिक्षण घेऊन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील अशा शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो. शहरातील काही प्रमुख खासगी हायर सेकंडरींचा निकाल शंभर टक्के लागला की त्याच विद्यालयात प्रवेश मिळविण्याची खटपट सुरूहोते. अनेक सरकारी हायर सेकंडरीत विविध शाखांत जागा शिल्लक असतात; पण विद्यार्थ्यांचा कल ठरावीक हायर सेकंडरीकडे असतो. विद्यार्थी व पालकांची ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. तसेच सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातून शिक्षण घेऊनही चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात याबाबत विश्वास निर्माण होण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच प्रवेशादरम्यान होणारा गोंधळ आणि विद्यार्थ्यांवरील मानसिक तणाव कमी होऊ शकतो. (प्रतिनिधी)
प्रवेशासाठी धावपळ सुरूच
By admin | Updated: June 11, 2014 01:18 IST