लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : धावपळीच्या युगात आज प्रत्येकाने रोज सकाळी वेळ काढून योगासने केल्यास उत्तम आरोग्य प्राप्त होईल. त्याचबरोबर राज्यातील शाळांनीही यासाठी पुढाकार घेऊन रोज १५ मिनिटे विद्यार्थ्यांकडून योगासने करून घ्यावीत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, पोलिस महासंचालक आलोक कुमार व इतर सरकारी अधिकारी, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही योगसाधना केली. आपण आपल्या आयुष्यात आयुर्वेद जीवनशैलीचा अवलंब केला तर आपले कुटुंब आनंदी व निरोगी बनू शकते. प्रत्येक कुटुंबाने 'फॅमिली योगा'ची सुरुवात करावी. यामुळे आजारांवर नियंत्रण ठेवता येईल.
वाढते मधुमेह, रक्तदाब या सारख्या आजारावर आम्ही नियंत्रण ठेऊ शकतो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे एकाग्रतेबरोबर शारीरिक व मानसिक आरोग्य बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शाळांमध्ये दररोज १५ मिनिटे योगाभ्यास सुरू करण्याचा सल्ला योग शिक्षकांना दिला आहे. विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने ही बाब अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले.
समृद्ध परंपरा...
योगाचे महत्त्व फक्त वैयक्तिक आरोग्यासाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक आणि शारीरिक समतोलासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आज धावपळीच्या युगात, योगासारख्या शाश्वत आणि शिस्तबद्ध प्रणालीच्या माध्यमातून आपण संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो. ही केवळ प्राचीन परंपरा नाही, तर आजच्या काळातील गरज आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
योगसाधना गरजेची : राणे
योगातून ऊर्जा, शिस्त आणि आनंद मिळत असतो. त्यामुळे योग केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील आरोग्य आणि एकतेची ताकद बनला आहे, असे उद्गार आरोग्य मंत्री विश्वजित राणे काढले. योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. मात्र, आज ती संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण साधना बनली आहे. गोव्यातून या जागतिक चळवळीचा भाग होणे हा गौरवाचा विषय असून, ही भावना पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही मंत्री विश्वजित राणे म्हणाले.
जगालाही पटले योगाचे महत्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्व जगभर पोहचविले आहे. त्यामुळे जात, धर्म, देश, भाषा या सर्व सीमापार करुन योग आता जगभर पोहोचला आहे. जगातील सर्व देश आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहेत. यातून आमची भारतीय संस्कृती आता जगभर पोहचली आहे.