लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकारच्या उल्लेखनीय कामगिरीचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल 'संकल्प से सिद्धी' कार्यशाळेत आढावा घेतला. त्यात 'विकसित भारत २०४७' हे स्वप्न साकार करण्यासाठी आणि प्रगतिशील, विकसित गोवा बांधण्यासाठी पुढील रोडमॅपवरही चर्चा केली.
पणजी येथे सोमवारी भाजप कार्यालयात 'संकल्प से सिद्धी' या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय निमंत्रक दुष्यंत कुमार गौतम यांच्यासह ९५ टक्के मंत्री, आमदार उपस्थित होते. कार्यशाळेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दुष्यंत कुमार म्हणाले की, केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर गेल्या ११ वर्षाच्या काळात सेवा, सुशासन व गरीब कल्याणाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी झाल्या त्याची माहिती पुढील काळात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता घरोघरी जाऊन लोकांना देईल.
'ऑपरेशन सिंदूर'नंतर राष्ट्रवाद जागा झालेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कामाचा ठसा देशवासीयांच्या मनावर उमटवला आहे. त्यामुळे त्यांच्या या कामगिरीबद्दल जनमानसात जागर करण्याचे काम 'संकल्प से सिद्धी' या माध्यमातून केले जाणार आहे.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, 'कार्यशाळेत मंत्री, आमदारांची २५ टक्के उपस्थिती होती. यावेळी संकल्प से सिद्धीच्या राज्यातील उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, असे सांगितले, तर पत्रकार परिषदेस राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हेही उपस्थित होते.
'एक पेड माँ के नाम' उपक्रम
गौतम म्हणाले की, मोदींच्या काळात ४ कोटी लोकांना पक्की घरे मिळाली. हर घर जल योजना आणली. रस्ते, महाविद्यालये, विद्यापीठे आली. त्याचबरोबर १७ ते २० जून योग कार्यशाळा घेतली जाईल. ५ जून ते १५ ऑगस्ट पर्यावरण दिवस साजरा केला जाईल. 'एक पेड माँ के नाम' उपक्रमाखाली अधिकाधिक वृक्षारोपण केले जाईल.
असे असेल अभियान
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ८ जून रोजी दिल्लीत हे अभियान सुरू करतील. ९ रोजी प्रत्येक राज्यात मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री १०० ठिकाणी पत्रकार परिषदा घेतील. १० ते १२ जून या काळात जिल्हानिहाय कार्यक्रम होतील. जिल्हास्तरावर प्रदर्शने भरवली जातील. व्याख्याते, डॉक्टर, अभियंते, अभियंतो याच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल. आयुष्मान कार्डवर १० लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातील.