लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :जीएसटी दर सुधारणांचे प्रदेश भाजपने जोरदार स्वागत केले असून वस्तूंवरील जीएसटी कमी झाल्याने विक्रीत वाढ होईल व सरकारचा महसूलही वाढेल, असा दावा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, 'शेतकरी तसेच इतर वर्गालाही मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्य विम्यावरील जीएसटी शून्यावर आणून जनतेच्या आरोग्याबद्दल सरकारला किती काळजी आहे, हे दाखवून दिले आहे.
दामू म्हणाले की, जीएसटी कौन्सिलने सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू ठेवून जीएसटी दरांमध्ये सुधारणा केली आहे. औषधे, वैद्यकीय उपकरणे स्वस्त होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जीएसटी कमी झाल्याने शेतकय्रांना ट्रॅक्टर वगैरे खरेदी करता येतील. वस्त्रोद्योग, आरोग्यसेवा, ऑटोमोबाइलमधील जीएसटी कमी केला आहे.
सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून निर्णय घेतला आहे. जीएसटी स्लॅबचे सुसूत्रीकरण आणि प्रक्रियांचे सरलीकरण ही बाबही महत्त्वाची आहे. ग्राहकोपयोगी वस्तू, कपडे आणि इतर उत्पादनांची मागणी वाढेल त्यामुळे उत्पादनही वाढणार आहे.'