लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्वातंत्र्य सेनानी राम मनोहर लोहिया आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यास सरकारला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पणजीत आझाद मैदानावर झालेल्या क्रांतिदिन सोहळ्यात ते बोलत होते. उर्वरित स्वप्नपूर्ती २०२७पर्यंत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, स्वातंत्र्य संघटनेचे अध्यक्ष रोहिदास ऊर्फ दाद देसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांसह नौदलाचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा पारतंत्र्यात होता, हे आपले दुर्दैव आहे.
सरकार हर घर नल जल ही मोहीम पूर्ण करून थांबलेले नाही तर आता हर घर फायबर मोहीम सुरू झालेली आहे. आग्वाद तुरुंगाचे आज म्युझियममध्ये रूपांतर करण्यात आले आहे. गोवा हा १०० टक्के साक्षर झाल्याचे सांगताना आपल्याला आनंद होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोवा स्वातंत्र्य संग्रामाचे दर्शन घडविणारे अॅनिमेशन फिल्म १९ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात आयआयटी, एनआयटी यांसारख्या व्यावसायिक शिक्षणसंस्था आहेत. फॉरेन्सिक विद्यापीठ आहे. उच्च दर्जाच्या साधन-सुविधा निर्माण झाल्या आहेत.
स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे स्वातंत्र्य मिळाले
४५१ वर्षाच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी आपल्याला राम मनोहर लोहिया आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांनी क्रांतीची साद घातली. गोव्यात विश्रांतीसाठी आलेल्या डॉ. राम मनोहर लोहियांनी गोमंतकीयांमध्ये क्रांतीची ज्योत पेटवली तो हा दिवस. आज हयात असलेल्या आणि नसलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य सैनिकांचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे काम करीत आहे. २०२७पर्यंत उर्वरित स्वप्नही पूर्ण होईल.