शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
3
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
4
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
5
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
6
विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
7
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
8
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
9
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
10
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
11
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
12
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
13
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
14
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
15
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
16
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
17
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
18
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
19
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
20
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पांचे स्वागत करा; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 12:39 IST

गोव्याला उपयुक्त ठरतील, लोकांचे कल्याण करतील असे प्रकल्प उभे राहायलाच हवेत; मात्र लोक विरोध का करतात, हे देखील समजून घ्यावे लागेल. 

गोमंतकीयांनी चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत अलीकडे विविध सोहळ्यांमध्ये करीत आहेत. काल शुक्रवारी काणकोणला लोकोत्सव उद्घाटन सोहळ्यातही मुख्यमंत्री असेच बोलले. काणकोणचा जर विकास व्हायचा असेल तर सरकारचे चांगले काम व चांगले प्रकल्प यांचे स्वागत लोकांना करावे लागेल. गोव्यात अलीकडे विविध प्रकल्पांना विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकतेचा मंत्र सर्वत्र आळवणे सुरू केले आहे. अर्थात, गोव्याला उपयुक्त ठरतील, लोकांचे कल्याण करतील असे प्रकल्प उभे राहायलाच हवेत; मात्र लोक विरोध का करतात, हे देखील समजून घ्यावे लागेल. 

कोणताही राजकीय पक्ष जेव्हा विरोधात असतो, तेव्हा त्या पक्षाची भूमिका विरोधाचीच असते. गोव्यात सेासारखे (एसईझेड) प्रकल्प येऊ लागले होते तेव्हा भाजपने रान उठविले होते. मेटास्ट्रीप असो, नायलॉन ६,६ असो किंवा अन्य काही उद्योगांना विरोध करण्याची परंपरा जुनीच आहे. प्रादेशिक आराखड्याला विरोध होतोय, झोनिंग प्लॅनला विरोध होतो, ओडीपींना आणि एखादा भाग पीडीएमध्ये घालण्यासाठीही विरोध होतो. यात जनतेलाच दोष देता येणार नाही किंवा एनजीओंनाच जबाबदार धरता येणार नाही. बेकायदा मायनिंगला विरोध झाला, शेवटी मायनिंग बंद झाले. यास क्लॉड अल्वारीस जबाबदार नाहीत तर काही ठरावीक अतिलोभी खनिज व्यावसायिक कारणीभूत आहेत. बोरी येथे पुलाला विरोध होतोय, कारण लोकांना त्यांची घरे वाचवायची आहेत. पुलासाठी जो मार्ग ठरवलाय, त्याला लोकांचा आक्षेप आहे. सरकारी प्रकल्पांसाठी कधीच राजकीय नेत्यांच्या जमिनींचा बळी दिला जात नाही, सामान्य माणसाचीच जमीन, शेतीभाती जाते. त्यामुळे विरोध होतो. एनजीओ किंवा आरटीआय कार्यकर्ते दोन प्रकारचे आहेत. 

काहीजण प्रामाणिकपणे जनतेची बाजू घेऊन लढत आहेत तर काहीजण वेगळे हेतू साध्य करण्यासाठी संघर्षाचे नाटक करीत आहेत. काहींना केवळ विरोधाचेच राजकारण करायचे असते. लोकांना विकास हवा आहे. मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे लोकांनी चांगल्या सरकारी कामांना व विकास प्रकल्पांना पाठिंबा द्यायला हवा; मात्र कोणता प्रकल्प चांगल्या व्याख्येत बसतो ते आमदार व मंत्री लोकांना नीट समजावून सांगू शकत नाहीत. कोणता प्रकल्प खरोखर लोकांच्या हितासाठी आहे, हे सरकार किंवा ग्रामपंचायती जनतेला पटवून देऊ शकत नाहीत. कारण काही राजकारण्यांची विश्वासार्हता रसातळाला गेलेली आहे. आयआयटी प्रकल्पाचे स्वागत करायला हवे; पण आयआयटीसारखी संस्था लोकांच्या लागवडीखालील जमिनीवर उभी राहू नये, ही जनतेची भूमिका आहे. सत्तरी तालुक्यात आयआयटीला परतवून लावले गेले. कारण तिथे झाडे आहेत, मंदिर आहे व लागवडीखालील महसूल जमीन आहे. 

सांगे येथे आयआयटीला का विरोध होतो, त्या विरोधामागील खरी कारणे कोणती, याचा शोध घ्यावा लागेल, सांतआंद्रे मतदारसंघातील न्हावशी येथे मरिना प्रकल्पाला मच्छिमार विरोध करतात. मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास विरोध झाला होता; पण तो प्रकल्प साकारल्यानंतर गोमंतकीयांना, विशेषतः पेडण्यातील लोकांना प्रथम नोकऱ्या मिळतील असे प्रत्येक राजकीय नेत्याने जाहीर केले होते. खरोखर तिथे किती पेडणेवासीयांना रोजगार मिळाला? माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व पेडण्याचे माजी आमदार बाबू आजगावकर यांनी याबाबतची माहिती जाहीर करावी. पेडणेच्या आयुष इस्पितळात गोमंतकीयांना नोकऱ्या मिळाल्या की, सिंधुदुर्गमधील लोकांना नोकऱ्या मिळाल्या याविषयी सोशल मीडियावर अलीकडे चर्चा रंगली होती. लोकांची अनेकबाबतींत फसवणूक होत असते. त्यामुळे जनता रस्त्यावर येते.

राज्यातील अनेक ग्रामपंचायींवर लोकांचा विश्वास नाही. किनारी भागात तर काही पंच व सरपंचांना लोक शिव्या देतात. काहीजण रियल इस्टेट व्यवसायातील माफिया होऊ पाहत आहेत. दिल्लीवाल्यांना जमिनी विकण्यातच ते व्यग्र आहेत. त्यामुळे ग्रामसभांमध्ये काहीवेळा चांगल्या प्रकल्पांनाही लोक विरोध करतात. गोयंकारांना गोव्यात नोकऱ्या मिळत नाहीत. सरकारकडूनही शासकीय नोकऱ्यांची विक्रीच केली जाते. यामुळे गोमंतकीय शिक्षित तरुण गोव्याबाहेर स्थलांतर करीत आहेत. सरकारचे हेतू चांगले असतील तर लोक चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करतील.

 

टॅग्स :goaगोवा