लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सरकारकडून खुलाशांना देण्यात येणारी पेन्शन कायमस्वरूपी सुरू ठेवणार आहे. यापुढे राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास पेन्शनमध्ये एक हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
मडगाव रवींद्र भवनमध्ये बुधवारी गोवन सीमन असोशिएशन ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित 'तारवोट्यांचो दिस' कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर एनआरआय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर, माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव, बंदर कप्तान ऑक्टावो रॉड्रिग्स, इन्स्टिट्यूट ऑफ मरिन स्टडीजचे संचालक शिवराम कामत, ब्यू शिल्ड मेडिकल क्लिनिकचे संचालक डॉ. विजय बेलानी, इस्टिट्यूट ऑफ मरिन इंजिनियर अनुराग कृष्णा, गोवन सीमन असोशिएशनचे अध्यक्ष फ्रैंक व्हिएगस, केळशी पंचायतीचे सरपंच डिक्सन वाझ उपस्थित होते. एनआरआय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर, माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमांत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते आलेमाव यांच्यासह २५ वर्षे खलाशी म्हणून काम केलेल्यांचा सत्कार करण्यात आला.
खलाशांना १०० ते १५० वर्षाची परंपरा आहे. त्यांनी कित्येक वर्षे बोटीवर काढली आहेत. खलाशी हा गोव्याचा अभिमान आहे. गोवा सरकारने खलाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच सहकार्य केले. खलाशी म्हणून बोटीवर काम करण्यासाठी लागणारे कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम आता गोव्यात सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे येथील युवकांना त्याचा लाभ होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सीमेन टू सीएम
राज्य सरकार खलाशांना सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. सरकार त्यांच्याकडे सकारात्मक नजरेने पहात असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमांव हे 'सीमेन टू सीएम' असे असे सांगून ते म्हणाले, एक तारवटी गोव्याचा मुख्यमंत्री होणे ही खलाशांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अॅड. सावईकर म्हणाले, तारवटी बोटीवर खुप कष्ट घेतात, त्यांना सरकारकडून आवश्यक सर्व प्रकारचे सहकार्य केले जाते. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते आलेमाव यांच्यासह २५ वर्षे खलाशी म्हणून काम केलेल्यांचा सत्कार करण्यात आला.