पणजी : राज्यातील वाहन अपघातांच्या बळींची संख्या गेल्या महिन्यापर्यंत ३७.८० टक्क्यांनी वाढली आहे, असे पोलीस महासंचालक ओ. पी. मिश्रा यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यातील वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी सर्वकष असा आराखडा पोलिसांच्या वाहतूक विभागाने तयार केला असून, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे मिश्रा यांनी स्पष्ट केले. नियमभंग करणार्या वाहनांविरुद्ध गुरुवारपासून आम्ही वाहतूक खात्याच्या सहकार्र्याने कारवाई करू. हेल्मेट न घालता दुचाकी चालवणार्या पोलिसांविरुद्धदेखील कारवाई केली जाईल. हेल्मेटच्या वापराबाबत अधिकाधिक जागृती व्हायला हवी. गेल्या एप्रिलपर्यंत वर्र्षभरात एकूण १४९३ वाहन अपघात झाले व त्यात ११३ व्यक्तींचे बळी गेले. यात ७५ म्हणजे ६६.३७ टक्के दुचाकीस्वार आहेत, असे मिश्रा यांनी नमूद केले. शनिवार व रविवारीच जास्त अपघात होतात. ९२.४९ टक्के अपघात हे निष्काळजीपणे व भरधाव वाहन हाकल्याने होतात. मडगाव, वेर्णा, फोंडा, पणजी व पर्वरी पोलीस स्थानकांच्या कक्षेत जास्त अपघात झाले. नियमभंग करणार्या वाहनचालकांकडून वर्षभरात पोलिसांनी १ कोटी २२ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा दंड गोळा केला आहे, असेही मिश्रा यांनी स्पष्ट केले. (खास प्रतिनिधी)
वाहन अपघातातील बळींच्या संख्येत ३७.८० टक्क्यांनी वाढ
By admin | Updated: May 15, 2014 16:30 IST