लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेवटच्या घटकांपर्यंत पोहचून विकास करणारे आहे. भाजपच्या कार्यकाळात कल्याणकारी योजनांना गती देण्यात आली आहे. त्याच्या जोरावर कुंकळ्ळी मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा कमळ फुलेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केला. कुंकळ्ळी भाजप मंडळाचा मेळाव्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर खासदार सदानंद शेट तानावडे, माजी उपमुख्यमंत्री व कुंकळ्ळी मतदारसंघाचे प्रभारी बाबू कवळेकर, माजी आमदार राजन नाईक, माजी आमदार क्लाफासियो डायस, माजी खासदार नरेंद्र सावईकर, कुंकळ्ळी भाजप मंडळाचे अध्यक्ष कुणाल खोलकर, दक्षिण गोवा जिल्हा प्रभारी सर्वानंद भगत, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर, जिल्हा पंचायत अध्यक्षा संजना वेळीप, सरचिटणीस सुदेश भिसे, विदेश देसाई, अध्यक्ष मारुती देसाई उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष नाईक म्हणाले की, 'भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे. या परिवारात समाजातील सर्व घटकांचा विचार केला जातो. राज्यात विकासकामे सुरू आहेत. त्याच जोरावर पक्ष पुन्हा बहुमताने सत्तेवर येईल. खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांची माहिती दिली. कार्यकर्त्यांनी संघटीत होऊन निवडणुकीत भाजप उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले.
कुंकळ्ळी मतदारसंघाचे प्रभारी बाबू कवळेकर म्हणाले, 'या मतदारसंघात सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा पंचायत व पालिका निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून द्यावेत. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी यावेळी सदस्यांचे स्वागत केले. कुंकळ्ळी भाजप मंडळाच्यावतीने नाईक यांचा सत्कार करण्यात आला. विदेश देसाई यांनी सूत्रसंचालन केले. सुदेश भिसे यांनी आभार मानले.