डिचोली : संपूर्ण विश्वाचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्या राष्ट्राजवळ असून जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे व त्या दृष्टीने ‘मार्इंड सेट’ करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. सद््गुरू श्री वामनराव पै जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. माशेलकर उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते. साखळी येथील रवींद्र भवनात रविवारी पुरस्कार प्रदान सोहळ््याचे आयोजन जीवन विद्या मिशनतर्फे केले होते. या प्रसंगी विश्वसंत सद््गुरू वामनराव पै यांचे सुपुत्र प्रल्हाद वामनराव पै, सभापती राजेंद्र आर्लेकर, आ. डॉ. प्रमोद सावंत, डॉ. संजय, गौरीश धोंड, प्रभाकर उंडे, आनंद राणे, उमेश पांगम, प्रवीण सुभेदार, विश्वास देशपांडे आदींचीही उपस्थिती होती. डॉ. माशेलकर म्हणाले, उद्याचा भारत घडविणाऱ्या आजच्या बालकांवर सुसंस्कार गरजेचे आहेत. आचार - विचारांची सांगड घालण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. तीर्थक्षेत्रे ही ज्ञानक्षेत्रे झाली पाहिजेत. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच पर्यावरणीय आणि राष्ट्राभिमानी मूल्यांची जोपासना करणारी सक्षम नागरिकांची फौज निर्माण झाली पाहिजेत. दरम्यान, प्रल्हाद पै यांनी ‘विज्ञान आणि विवेक’ या विषयावर मार्गदर्शन केले. सुनील रेगे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
विश्वाच्या नेतृत्वाची भारताकडे क्षमता
By admin | Updated: December 15, 2014 01:22 IST