लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रेंट ए कार, रेंट ए बाइकवाल्यांनी खासगी वाहनांचा व्यावसायिक वापर केल्यास तत्काळ परवाने रद्द केले जातील. त्यासाठी लवकरच वाहतूक खाते वटहुकूम काढणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
पोलिस मुख्यालयात काल घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलिस तसेच आरटीओ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. वाहतूक संचालक प्रविमल अभिषेक, आयजीपी, डीआयजी, उत्तर व दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर याप्रसंगी बैठकीला उपस्थित होते.
उत्तर गोव्यात पत्रादेवी व केरी चेक नाक्यांवर, तसेच दक्षिण गोव्यात मोले व पोळे चेक नाक्यांवरील पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा आणि अंमलबजावणी तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. रस्त्याच्या कडेला सार्वजनिक सुविधा आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी जमिनीची उपलब्धता आणि आयटीजी द्वारे अर्ज प्रक्रियेचा आढावा घेतला आणि पोलिस अधिक्षकांकडून अंमलबजावणीविषयी माहिती घेतली. सार्वजनिक अधिसूचना धोरण, सीमेवरील स्वयंचलित देखरेख यंत्रणा याबाबत आढावा घेतला.
पर्यावरणीय उपक्रम म्हणून सर्व पोलिस ठाण्यांमध्ये 'एक पेड माँ के नाम' हा हरित उपक्रम राबविला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार गोव्याच्या सीमेवर अखंड, पारदर्शक आणि नागरिक अनुकूल गतिशीलता आणि अंमलबजावणी परिसंस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. रेंट ए कार, रेंट ए बाईकवरुन अलीकडेच महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सार्वजनिक पार्किंगची जागा ही वाहने व्यापतात व त्यामुळे इतर वाहनधारकांवर अन्याय होतो. नवीन परवाने देणे बंदच करावेत, अशी मागणी बाबुश यांनी केली होती.