पणजी : पावसाळा आणि नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी, दरवर्षीप्रमाणे यंदाही सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना रेनकोट व गणवेश मिळालेले नाहीत. पाठ्यपुस्तके मात्र वेळेत उपलब्ध झाली आहेत.पावसाळ्यापूर्वी रेनकोट मिळणे अत्यंत गरजेचे असते. सरकारी शाळांत शिकणारी बहुतेक मुले खूप गरीब असतात. पावसाळा संपायला पंधरा-वीस दिवस असताना मग त्यांच्या हाती शिक्षण खाते रेनकोट देते, हा वार्षिक अनुभव झाला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षी तरी सुधारणा होईल, असे पालकांना अपेक्षित होते. रेनकोट व गणवेशासह वह्यादेखील मिळालेल्या नाहीत. मुलांना पाठ्यपुस्तके वेळेत मिळाली, एवढे मात्र समाधान आहे.रेनकोट व गणवेशासाठी मुलांना कुपन्स दिली जातील, असे सांगितले होते; पण अजून कुपनांचाही पत्ता नाही, असे काही शिक्षकांनीही सांगितले. आमच्या मुलांना गणवेश किंवा कुपनही देऊ नका, त्याऐवजी पैसे दिल्यास आम्हीच मुलांच्या शरीरास योग्य अशा मापाचे गणवेश शिवून घेतो, असे अनेकदा शिक्षण खात्यास सांगितले; पण त्याची दखल घेतली जात नाही. शेवटच्या क्षणी जे अघळपघळ गणवेश पुरविले जातात त्यातून बहुतेक विद्यार्थी शेतातील बुजगावणे दिसतात, असा अनुभव काही पालकांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितला. पहिली व तिसरी इयत्तेच्या मुलांना मोफत रेनकोट व गणवेश देण्याची योजना ही पुरवठादारांच्याच पथ्यावर पडते, असे काही शिक्षकही बोलून दाखवतात.(खास प्रतिनिधी)
सरकार यंदाही नापासच
By admin | Updated: June 9, 2015 00:33 IST