लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : समाज सुधारलेला आहे. आपण सुधारताना समाज आणि आपल्या आई-वडिलांना विसरू नका. समाजाची जबाबदारी घेताना त्या समाजाची सेवा करावी लागते, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी केले. कला आणि संस्कृती संचालनालय आणि मडगाव रवींद्र भवन यांच्या संयुक्त विद्यमाने बोर्डा येथील संत हरळय्या समाजातर्फे आयोजित 'सांस्कृतिक महोत्सव २०२५'मध्ये नाईक बोलत होते.
रवींद्र भवनात रविवारी आयोजित कार्यक्रमाला नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, माजी उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, कोंकणी अकादमीचे अध्यक्ष पूर्णानंद च्यारी, डॉ. प्रीतेश कोटे, समाजाचे अध्यक्ष सिद्धार्थ शंके, दवर्ली उपसरपंच विद्याधर आर्लेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप पंडित यांनी केले.आपण उंच पदावर पोहोचलो, तरी आपल्या लहान समाजाला वर काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले.
समाज संघटना स्थापन केली म्हणून होत नाही, त्यांच्याकडून कार्य व्हावे लागते. संत हरहळय्या समाज स्थापन करण्यामागे समाजाला एकत्र आणण्याचा हेतू होता. तो सफल झाला असून समाजाने मोठी प्रगती केली आहे. कोमुनिदादची जागा या समाजाला द्यावी. हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे नेणार. कोमुनिदादची जागा या समाजाला दिली तर या समाजाचा मोठा उद्धार होईल, असे माजी मंत्री आजगावकर यांनी सांगितले.