पणजी : येत्या महिन्यात होणाऱ्या जिल्हा पंचायतींच्या निवडणुकांबाबत भाजपने ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी जिल्हा पंचायत निवडणुकांवेळी युती करायची नाही, असेच तत्त्वत: ठरले आहे. कळंगुट येथे सोमवारी भाजपचे सगळे मंत्री, आमदार आणि पक्षाचे राज्यभरातील गट अध्यक्ष व सरचिटणीस यांची संयुक्त बैठक पार पडली. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह सगळे मंत्री व बहुतेक आमदार बैठकीत सहभागी झाले. जिल्हा पंचायत निवडणुकांबाबत त्या बैठकीत रणनीती ठरविण्यात आली. पक्षीय पातळीवर निवडणुका होत असल्याने भाजपच्या सगळ्या आमदारांनी, गट अध्यक्ष व मंडळ समितीच्या सरचिटणीसांनी त्यासाठी तयार राहावे, असे बैठकीत ठरले. सर्वांनी एकजुटीने लढून उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकवावा, असेही आवाहन बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना करण्यात आले. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने सुरू केलेली सदस्य नोंदणी मोहीम तसेच डिचोली, सावर्डे, सांताक्रुझ अशा काही मतदारसंघांतील लोकांना त्या पक्षात देण्यात आलेला प्रवेश याचे पडसादही बैठकीत उमटले. भाजपचे काही आमदार व पदाधिकारी यांच्या भावना त्याविषयी तीव्र आहेत. येत्या १५ मार्च रोजी जिल्हा पंचायत निवडणुका होणार आहेत. एकदा निवडणुकांची राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा झाल्यानंतर मग आम्ही मगो पक्षाशी जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत युती करायची की नाही ते ठरवू, असे पक्षातर्फे आमदारांना सांगण्यात आले. प्रत्यक्षात युती करायचीच नाही, असे ठरले असल्याचे सूत्रांनी सांगितले. मगो पक्ष मात्र आपण भाजपला युतीसाठी प्रस्ताव देणार असल्याचे सांगत आहे. (खास प्रतिनिधी)
जिल्हा पंचायत निवडणूक भाजपतर्फे स्वबळावरच
By admin | Updated: February 3, 2015 01:35 IST