लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: आज शत्रुदेश आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहत असून त्यांचे डोळे फोडण्याची क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहणे गरजेचे आहे. भारताला सर्वात शक्तिशाली देश बनवण्यासाठी पंतप्रधान मोदी सतत काम करत असून त्यांच्या पुढाकारामुळेच देशाच्या साधनसुविधेत मोठी भर पडली आहे. २०२७ मधील विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यासह कुठ्ठाळी मतदारसंघातही भाजपला ५२ टक्के मते मिळतील. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित राहून काम करावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी केले.
सांकवाळ, वेर्णा येथे कुठ्ठाळी मतदारसंघाचा भाजप कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी नाईक बोलत होते. त्यांच्यासोबत राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस नरेंद्र सावईकर, सचिव सर्वानंद भगत, दक्षिण गोवा अध्यक्ष प्रभाकर गावकर, कुठ्ठाळी भाजप मंडळ अध्यक्ष सतीश पडवाळकर, जिल्हा पंचायत सदस्या अनिता थोराट, कुठ्ठाळी भाजप प्रभारी चंद्रकांत गावस, नारायण नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी दामू नाईक म्हणाले, की भारताला सर्वांत शक्तिशाली देश बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी योग्य पावले उचलत आहेत. त्यांनी देशातील महामार्ग, रेल्वेस्थानक, विमानतळ अशा अनेक साधनसुविधांचा विकास केला. भाजप लोकांच्या हिताचा विचार करत असल्यानेच अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचल्या. सर्वच वर्गातील नागरिकांच्या हितासाठी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार काम करत आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन सिंदूर राबवून आपल्या जवानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला.