पणजी: मिरामार किनाऱ्यावर मंगळवारी कोसळलेल्या विजेच्या धक्क्याने केरळ येथील पर्यटक अखिल विजयन (३५) याला मरण आले. तर त्याची पत्नी व मित्र बेशुध्द पडले. याप्रकरणाची पणजी पोलिसांनी नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
अखिल हा आपली पत्नी, मित्रांसोबत गोव्यात फिरण्यासाठी आला होता.मंगळवारी रात्री सात ते आठ जण मिरामार किनाऱ्यावर फिरायला आली होती. यात अखिल, त्याची पत्नी, मित्र तसेच लहान मुलांचा समावेश होता. अचानक विजेच्या लखलखाटासह तसेच ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु झाल्याने हे सर्व जण किनाऱ्यावरुन आपल्या गाडीकडे निघाले. इतक्यात अखिल , त्याची पत्नी व एक मित्र अचानक किनाऱ्यावरच कोसळले असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.
घटने नंतर किनाऱ्यावरील उपस्थितांनी या सर्वांना १०८ रुग्णवाहिकेव्दारे गाेमेकॉत उपचारासाठी दाखल केले होते. मात्र अखिल याला मृत घोषित करण्यात आले. तर त्याची पत्नी व मित्र शुध्दीवर आले .मृतदेहावर झालेल्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरीरावर विजेच्या धक्क्यामुळे जखमा झाल्याचे आढळून आले.त्यानुसार अखिल याचा मृत्यू हा मिरामार किनाऱ्यावर मंगळवारी कोसळलेल्या विजेच्या धक्क्याो झाल्याचे स्पष्ट केले.