लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असताना ग्रामीण भागात पाणी टंचाईचे चटके बसायला लागले आहेत. पाण्याची गरज वाढली असतानाच विहिरी व हातपंप आटायला लागले आहेत. त्यामुळे दूरवरून किंवा दुसऱ्या वॉर्डातून महिलांना पाणी आणावे लागत आहे.पाण्याचा उपसा वाढल्याने दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोलवर चालली आहे. पाण्याचे पुनर्भरण होत नसल्याने भूगर्भातील पाणी पातळी कमी होत आहे. शहरी भागात पाणीपुरवठा योजना असल्या तरी ग्रामीण भागात मात्र पाणी पुरवठा योजना नाहीत. त्यामुळे विहिरी किंवा हातपंपांच्या भरवशावर पाण्याची गरज भागवावी लागते. मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्यास सुरूवात झाली होती. महिन्याच्या शेवटी आता उग्र रूप धारण केले आहे. पाणी मिळत नसल्याने हातपंप व विहिरी यांच्यासमोर पाण्याचे भांडे धरलेल्या महिलांची झुंबड पाहायला मिळत आहे.आपल्या वॉर्डातील हातपंप व विहीर आटल्यानंतर गावातील ज्या हातपंपाला पाणी अधिक आहे. अशा हातपंपावर महिलांची गर्दी दिसून येत आहे. एप्रिल महिन्यापासून उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात होते. मे-जून या कालावधीत कडक उन्हाळा तापतो. त्यामुळे या कालावधीत पाणी टंचाईची समस्या अतिशय गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबांकडे पाळीव प्राणी आहेत. पावसाळा व हिवाळ्यात ही जनावरे तलाव, नाला येथील पाणी पिऊन येतात. मात्र उन्हाळ्यात पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने बाहेर तहान भागविणे शक्य होत नाही. परिणामी जनावरे घरीच येऊन तहान भागवत असल्याने पाण्याची समस्या वाढली आहे. पाणी भरण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.पाणी पुरवठा योजना नावापुरत्याचग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी शासनाने लाखो रूपये खर्चून काही गावांमध्ये पाणी पुरवठा योजना बांधून दिल्या आहेत. मात्र अनेक ग्राम पंचायती वीज बिल भरण्यास सक्षम नसल्याने संबंधित पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. काही पाणी पुरवठा योजनांमध्ये किरकोळ बिघाड निर्माण झाला आहे. हा बिघाड दुरूस्त करण्याची ऐपतही ग्राम पंचायतीमध्ये नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. योजना बांधून झाल्यानंतर कंत्राटदार काही दिवस स्वत: योजना चालविते. तोपर्यंत योजना चालविली जाते. त्यानंतर गावकरी पाणी पट्टी भरीत नाही. परिणामी ग्राम पंचायत आर्थिक अडचणीत येत असल्याने वीज बिल रखडून वीज पुरवठा खंडित होतो.
ग्रामीण भागाला पाणी टंचाईचे चटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:31 IST
मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असताना ग्रामीण भागात पाणी टंचाईचे चटके बसायला लागले आहेत. पाण्याची गरज वाढली असतानाच विहिरी व हातपंप आटायला लागले आहेत. त्यामुळे दूरवरून किंवा दुसऱ्या वॉर्डातून महिलांना पाणी आणावे लागत आहे.
ग्रामीण भागाला पाणी टंचाईचे चटके
ठळक मुद्देहातपंप व विहिरींवर गर्दी : ऐन उन्हाळ्यात निर्माण होणार गंभीर समस्या; गावासभोवतालचे पाण्याचे स्रोत आटले