काेरची : तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आपले कार्य मुख्यालयी राहून योग्यप्रकारे बजावत असताना, काही नागरिक त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे डाॅक्टरांचे मनाेधैर्य खचत आहे. बदनामी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, अन्यथा काम बंद आंदाेलन करण्याचा इशारा तालुका आराेग्य अधिकारी यांच्यासह डाॅक्टरांनी काेरचीचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरची तालुक्यातील एकूण २२ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी १ तालुका आरोग्य अधिकारी, ६ वैद्यकीय अधिकारी, ४ मानसेवी वैद्यकीय अधिकारी व ११ समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. गावातील जनतेस आम्हाकडून कसल्याच प्रकारचा त्रास नसूनसुद्धा गावातील काही विक्षिप्त प्रवृत्तीचे लोक आमची बदनामी करीत आहेत. उपकेंद्राची चावी मागणे, व्यक्तीश: धमकी देणे, पैशाची मागणी करणे, असे प्रकारसुद्धा करीत आहेत. तसेच समाजात आमची प्रतिमा मलिन करून आमचे मानसिक धैर्य खचवायचे प्रयत्न करीत आहेत.
मागील चार वर्षांत २ मातांसह १३ बालकांचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी पसरवत आहेत. वास्तविक २ माता व ५ बालक मृत पावले आहेत. दोन मातांपैकी एक माता सिकलसेल पीडित कारणाने नागपूरला रेफर होऊन मरण पावली. दुसरी माता नवेझरीवरून कोरची व नंतर गडचिरोली रेफर झाली. पुढे चंद्रपूरला रेफर करताना रस्त्यावरच मृत्यू पावली.
अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात वीज, वाहतुकीची सोय व इंटरनेटची सुविधा नसताना, कोरोना काळामध्ये अतिरिक्त ताण असताना मुख्यालयी राहून आरोग्यसेवा निरंतर देत आहोत. संबंधित बातमीची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा तालुक्यातील डाॅक्टर कामबंद आंदाेलन करतील, इशारा दिला आहे.