लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासीबहुल व दुर्गम गडचिरोलीला नक्षलमुक्त होण्याची अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. २७ जून रोजी राज्याच्या गृह विभागाने नक्षलग्रस्त जिल्हे व तालुक्यांची घोषणा केली. यात संपूर्ण गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त घोषित केला असून, गोंदियातील चार तालुक्यांचाही प्रभावित तालुक्यांत समावेश आहे.
जिल्ह्यात १९८० मध्ये माओवाद्यांनी शिरकाव केला. घनदाट जंगले, दुर्गम, अतिदुर्गम गावे तसेच प्रतिकूल भौगोलिक स्थिती, दारिद्रय, अज्ञान आणि पायाभूत सुविधांचा अभाव या सर्व परिस्थितीचा फायदा घेत ही रक्तरंजित चळवळ फोफावली. या चळवळीचा विस्तार संपूर्ण जिल्ह्यात तसेच - शेजारच्या गोंदियामध्येही झाला.
राज्यातील काही भागांमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्याने ७डिसेंबर २००४ व २०मे २००५ अन्वये राज्यातील जिल्हे, तालुके, गावे नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली होती. ४ फेब्रुवारी २०१३ मध्ये नव्याने नक्षलग्रस्त जिल्हे व तालुके जाहीर झाली. यातही संपूर्ण जिल्हा नक्षलग्रस्त घोषित केला होता. त्यानंतर २६ डिसेंबर २०१४ रोजी पुन्हा जिल्हा नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला.
हे तालुके नक्षलग्रस्तगोंदियातील आठपैकी चार तालुके नक्षलग्रस्त घोषित केले आहेत. गोंदिया, सालेकसा, देवरी व अर्जुनी मोरगाव या तालुक्यांचा समावेश आहे.
सुधारित प्रस्तावातही जिल्हा नक्षलग्रस्तचराज्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांना विविध आर्थिक लाभाच्या व बिगर आर्थिक लाभाच्या सवलती आहेत. सुधारित सवलतींचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने मंत्रिमंडळ मान्यतेसाठी ५ नोव्हेंबर २०२१ च्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला होता. नक्षलग्रस्त भागाचा फेरविचार करण्याच्या सूचनेनुसार पोलिस महासंचालक यांच्याकडून राज्यातील नक्षलग्रस्त भाग घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला.