गडचिरोली : काही वर्षांपूर्वी कुठल्याही मंगल कार्यालयात विशेष करून लग्न समारंभात कानी पडणारे डफडी व सनईचे सूर हल्ली ऐकायला मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच लग्नांमध्ये सनई वाजवणारे वादकही आता कुठेही नजरेस पडत नाही. केवळ मान म्हणून काहीच वेळ कॅसेटवर सनईचे सूर ऐकायला मिळतात. भारतात विविध संस्कृती एकत्र नांदतात. विविध प्रथा, परंपरा जोपासल्या जातात. यात शुभप्रसंगी मंगल वाद्य म्हणून सनईला मोठा मान आहे. कुठल्याही मंगल कार्यालयात सनई आणि डफडी वाजविली जात असे. 'डफडी'ची थाप कानावर पडली की मनाला आनंद मिळत असे. पूर्वी पोळा, मोहरम, दिवाळी, गणेशोत्सव, होळी व लग्न समारंभात डफड्यांचा संगतीने सनई वाजविली जात असे. ही वाद्य वाजविणाऱ्यांना मोठा मान होता. आदराने त्यांना बोलावून सनई वादन केले जात असे. सनईचे सूर कानी पडताच लग्नकार्य असल्याचे लक्षात येत असे. परंतु गत काही वर्षात बॅँन्ड संस्कृतीने सनई वादकांवर वाईट दिवस आणले आहे. कुणीही लग्नात सनई वाजवायला तयार नाही. काहीच लग्नांमध्ये केवळ मान म्हणून पाच ते दहा मिनिटांसाठी कॅसेटवर सनई वाजविली जाते. त्यामुळे पूर्वी प्रत्येक्ष ऐकायला मिळणारी सनई आता केवळ ध्वनिमुद्रिकांवर ऐकायला मिळते. पूर्वी श्रीमंतांकडेच बँडबाजा वाजत होता. आता मात्र बॅँडशिवाय एकही लग्न पार पडत नाही.(शहर प्रतिनिधी)
सनईचे मंजूळ स्वर केवळ ध्वनिमुद्रिकांमध्येच
By admin | Updated: February 11, 2015 01:57 IST