देसाईगंज : शहरातील आठवडी बाजारात चालू वर्षात चोरांनी अनेकांच्या मोबाईल व पाकिटावर हात साफ केला़ बाजारात चोरीच्या घटनात अचानक वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ मात्र चोरी होऊनही कित्येकांनी पोलिसांकडे घटनेची नोंद केली नाही़, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे़ रविवार हा स्थानिक आठवडी बाजाराचा दिवस आहे़ जिल्हाभरातील लहान-मोठे व्यापारी रविवारला उद्योगधंद्यासाठी शहरात येतात़ तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ शहरात असल्यामुळे या दिवशी बाजारात नागरिकांची गर्दी असते़ या गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरांचा धुमाकूळ शहरात वाढला आहे़. आठवडी बाजारात चोरीच्या घटनाचे प्रमाण काही दिवसांपूर्वी कमी झाले होते़ परंतु आता पुन्हा आठवडी बाजारात चोरट्यांनी सहा मोबाईल संच लंपास केल्याची घटना घडलेली आहे़ तसेच कित्येकांच्या पैशाचे पाकीटसुध्दा चोरट्यांनी लंपास केलेत़ या चोरीच्या घटनांमध्ये चार ते पाच तरूण सहभागी असल्याचे बोलले जात आहे़ आठवडी बाजारातील अधिक गर्दी असलेल्या भाजीपाला, मच्छी बाजारात चोरीच्या घटना घडलेल्या आहेत़ भाजीपाला विक्री चालत असलेल्या बाजारात पोलिसांची गस्तसुध्दा असते़ अशाही परिस्थितीत चोरांनी आपली कमाई केली आहे़ चोरींच्या वाढत्या घटनांमुळे देसाईगंजातील नागरिक सावध झाले असले तरी महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
आठवडी बाजारात चोरांची धूम
By admin | Updated: September 22, 2014 23:18 IST