दोन महिने उलटले : खरपुंडीच्या शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून गोठा बांधकाम पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यास ५१ हजार रूपयांचा धनादेश संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती गडचिरोली यांच्याकडून वितरित करण्यात आला नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कार्यवाही झाली नसल्याचे खरपुंडी येथील शेतकरी नारायण मुका भुरसे यांनी म्हटले आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वार्षिक नियोजन यथार्थदर्शी आराखड्यात समाविष्ट केलेल्या कामात गुरांच्या गोठ्यांचे बांधकाम करायचे होते. गडचिरोली पंचायत समितीअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना हे काम करण्याचे आदेश १५ डिसेंबर २०१४ ला देण्यात आले. त्यानुसार काम पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना काम झाल्यानंतर सदर पूर्ण कामाचे छायाचित्र काढून सदर कामाच्या खर्चाचे बिल पंचायत समितीकडे सादर करायचे होते. त्यानुसार खरपुंडी येथील नारायण मुका भुरसे या शेतकऱ्याने सर्व बिल व काम पूर्ण झाल्याचे छायाचित्र पंचायत समितीकडे सादर केले.मात्र दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटूनही संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वितरित करावयाच्या धनादेशावर सह्या न केल्याने शेतकऱ्याला ५१ हजारांचा धनादेश मिळू शकलेला नाही. याबाबत शेतकऱ्याने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे ७ जून २०१६ रितसर तक्रारही केली. परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडून तक्रारीवर काहीही कारवाई झाली नाही, अशी माहिती भुरसे यांनी लोकमतला दिली.
गोठा बांधकाम होऊनही अनुदानाचे वितरण नाही
By admin | Updated: August 26, 2016 01:17 IST