लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी दि.१५ ला मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. उत्तर भागातील ६ तालुक्यांपैकी कोरची आणि धानोरा तालुक्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर ड्युटी लागलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बुधवारी हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहचवण्यात आले. इतर केंद्रांवरील कर्मचारी गुरूवारी रवाना होतील. कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा आणि गडचिरोली या सहा तालुक्यांमध्ये शुक्रवारी मतदान होणार आहे. या तालुक्यांमध्ये एकही नामांकन दाखल न झालेल्या २ ग्रामपंचायती आहेत. तसेच १३ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांची पूर्णपणे बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय १३ ग्रामपंचायतींमध्ये काही जागा बिनविरोध निवडल्या गेल्या तर काही जागांवरील नामांकन वैध ठरले नाही. त्या १३ ग्रामपंचायतींमध्येही प्रत्यक्ष मतदान होणार नाही. आता मतदानासाठी १७० ग्रामपंचायती उरल्या असून त्यातील ११२४ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.एकूण ६१८ केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावर ४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस व इतर सुरक्षा दल कार्यरत राहणार आहे. धानोरा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींमध्ये एकही नामनिर्देशनपत्र दाखल न झाल्याने त्या ठिकाणी मतदान होणार नाही. तसेच पूर्णत: बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये गडचिरोली व कोरची तालुक्यात प्रत्येकी ४, आरमोरी व धानोरा तालुक्यात प्रत्येकी २ आणि कुरखेडा तालुक्यातील एका ग्रामपंचायतचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी येत्या २० जानेवारीला मतदान हाेणार आहे. या टप्प्यात चामाेर्शी, अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिराेंचा या सहा तालुक्यात निवडणूक हाेत आहे. या भागात एटापल्ली, भामरागड, सिराेंचा आणि अहेरी हे तालुके संवेदनशील आहेत. त्यामुळे त्या भागातही मतदान प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडण्याचे आव्हान पाेलीस यंत्रणेपुढे राहणार आहे.
मतदानाच्या दिवशी सुटी किंवा दोन तासांची सवलत राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. सर्व मतदारांना मतदानाचा हक्क योग्यरीतीने बजावता यावा यासाठी शासनाकडून परिपत्रकाच्या आधारे सूचना करण्यात आली आहे. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना निवडणुकीच्या दिवशी भरपगारी सुटी देण्याची सूचना करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना हक्क बजावण्यासाठी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. अशी सवलत न देणाऱ्यांबद्दल तक्रार आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांनी कळविले.