लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शनिवारी रात्री देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसासह गारा पडल्या. त्यामुळे उन्हाळी धान पीक तसेच भाजीपाला पिकांचे माेठे नुकसान झाले. तसेच काही भागात वादळासह पाऊस झाला. अनेकांच्या घरावरील कवेलू, छत उडून गेले.गडचिराेली : शनिवारी दिवसभर कडाक्याचे ऊन होते. त्यामुळे सायंकाळी पाऊस येईल, अशी अपेक्षा नसताना रात्री ८ वाजता वातावरणात अचानक बदल झाला. साेसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. गडचिराेली तालुक्यालाही अवकाळी पावसाने झाेडपून काढले. वादळामुळे अनेकांच्या घरांवरील छत उडून गेले. गडचिराेली शहरासह ग्रामीण भागाचा वीजपुरवठा खंडित झाला. अडपल्ली-गाेगाव परिसरातील वीजपुरवठा रात्रभर खंडित झाला हाेता. मुलचेरा : तालुक्यातील मल्लेरा या गावातील ४० घरांचे वादळामुळे नुकसान झाले आहे. कोंडा बोमा गरतुलवार, दिवाकर गंगाराम कोसनवार, तुळशीराम लिंगा आरके यांच्या घरांवरील कवेलू व टिनाचे छत उडून गेले आहे. काही गावांमध्ये गारपीटही झाली. गारीच्या तडाख्यामुळे शेकडाे पक्षी मरण पावले. तुळशी, काेरेगाव, चाेप : देसाईगंज तालुक्यातील विसोरा, तुळशी, कोकडी, झरी, फरी, उसेगाव, शिवराजपूर, चोप, कोरेगाव, शंकरपूर, बोळधा या गावांसह देसाईगंज तालुक्यातील इतरही गावांमधील उन्हाळी धान पिकाला गारपिटीने झोडपले. जवळपास एक तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे खोलगट व नाल्याशेजारील जमिनीत व धान पीकात पाणी साचले. धानाचा निसवा १०० टक्के होऊन धान पीक कापणी योग्य झाले होते. काल १ मे रोजी झालेल्या गारपीट व अवकाळी जोरदार पावसाने उभ्या धान पिकाला चांगलेच झोडपले. धान पिकाचे ५० टक्के नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आधीच करोनामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. काल झालेल्या गारपीटने धान पिकासोबतच आंब्याचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी सुमारे अर्धा तास गारांचा पाऊस सुरू होता. हरभऱ्याच्या आकाराएवढ्या व त्यापेक्षाही मोठ्या गारा पडल्याने लोंबाचे धान गळून पडले.
गारपीट व वादळी पावसाने आरमाेरी तालुक्याला झाेडपले
आरमोरी : आरमोरी शहरासह व तालुक्यातील अनेक भागांत शनिवारी रात्री मेघगर्जना, गारपिटीसह आलेल्या वादळी पावसाने उन्हाळी धान, मका व आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले. तसेच रात्रभर वीज पुरवठा खंडित राहिल्याने लोकांना रात्र अंधारात काढावी लागली. आरमोरी शहर व तालुक्यातील अनेक भागांत शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा सुरू झाला. आरमोरीसह अरसोडा, रवी, मुलूरचक, मुलूर रीठ, वघाळा, सायगाव, शिवणी, पाथरगोटा, पळसगाव, शंकरनगर, जोगीसाखरा, रामपूर परिसरात व तालुक्यातील अनेक भागांत जवळपास दोन तास गरपिटीसह वादळी पाऊस आला. वादळी पावसाने धान, मका यासह आंबा व इतर अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक फटका आंबा उत्पादकांना बसला. अनेक झाडांखाली आंबे माेठ्या प्रमाणात पडल्याचे सकाळी दिसून आले. सध्या उन्हाळी धान पूर्णतः भरलेला असून, काही दिवसांत धान कापण्याच्या स्थितीत हाेते. परंतु, वादळी पावसामुळे उभे धान जमिनीला टेकले. धान जमिनीला टेकल्याने ते कुजून खराब हाेण्याची शक्यता आहे. तसेच अनेक ठिकाणी झाडे कोसळली. अनेक गावांतील घरांवरचे कौले व पत्रेही उडाले.
आमदारांनी केली पाहणी आरमाेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजवे यांंनी चाेप, काेरेगावसह ज्या भागात गारपीट झाली, त्या गावातील शेतांना भेट देत धानपिकाची पाहणी केली. यानंतर नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना आमदार गजबे यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.