लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : जिमलगट्टा परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळासह पाऊस झाले. प्रचंड वेगाच्या वादळामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील टिनाचे छत उडून गेले आहे. त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे.मागील आठ दिवसापासून जिल्ह्याचे तापमान ४५ अंशांच्या वर पोहोचले होते. त्यामुळे दुपारी व रात्री असह्य उकाडा जाणवत होता. दुपारच्या सुमारास कडक ऊन्हामुळे घराबाहेर पडणे कठीण होत होते. मात्र रविवारी सकाळपासूनच थंड वारे वाहण्यास सुरूवात झाली. तसेच ढगाळ वातावरण असल्यामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला. जिमलगट्टा परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळासह पाऊस झाला. जिमलगट्टा परिसरातील अनेक नागरिकांची घरे टिन व कौलारू आहेत. वादळाचा सर्वाधिक फटका टिनाच्या घरांना बसला. जिमलगट्टा येथील स्वामी मार्लीवार यांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडून गेले. पत्रे उडून गेल्यानंतर पाऊस झाल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले. तसेच मेडपल्ली येथील सुधाकर येलम यांच्यासह १० ते १५ नागरिकांच्या घरांवरील कवेलु व टिन उडून गेले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नुकसान झाल्याने घरांची डागडुजी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलचेरा तालुक्यात दुपारच्या सुमारास वादळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पाऊस झाल्याने शेतकरी खरीपपूर्व हंगामाच्या कामांना सुरूवात करणार आहे.वादळामुळे मेडपल्ली येथील सुधाकर येलम यांच्या घरावरील टिनाचे पत्रे घरापासून जवळपास ५० मीटर अंतरावर असे उडून गेले.मुलचेरा येथे रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. रस्त्यांवर असे पाणी साचले होते.