गडचिरोली : डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र व कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषक विज्ञान मंचची ९० वी सभा पार पडली. या सभेत अळींबी उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला. अळींबीचे उत्पादन वाढवून फायदेशीर लघुउद्योग निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. पुरूषोत्तम नेहरकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. गणेश भगत, डॉ. सुहास मोरे, डॉ. शुभांगी अलेक्झांडर, प्रा. संदीप कऱ्हाळे उपस्थित होते. कार्यक्रमादम्यान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेतीचे महत्व देशाला पटवून दिले. तर सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे कृषी व समाज परिवर्तनाचा पाया रोवला गेला, असे उद्गार डॉ. पुरूषोत्तम नेहरकर यांनी काढले.डॉ. भगत यांनी उन्हाळी भात लागवड तसेच भुईमूग लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. शिक्षण हा कृषीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अभ्यासूवृत्तीने शेती करावी, असे आवाहन डॉ. सुहास मोरे यांनी केले. सभेला तालुक्यातील ५० हून अधिक शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारीही उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. संदीप कऱ्हाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवराव ठाकरे, बाबुराव भोयर, निर्मला रेचनकार यांच्यासह कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
अळींबी उत्पादनावर भर
By admin | Updated: January 3, 2015 23:02 IST