आरमोरी : गोरगरीब व वंचितांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी वन विभागातील व इतर विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी स्वत:ला समाजसेवेत झोकून द्यावे व समाजसेवा करावी, असे आवाहन देसाईगंजचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी केले. आरमोरी वनपरिक्षेत्र कार्यालयात वनविभागातील सेवानिवृत्तांचा सत्कार व निरोप समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून देसाईगंजचे सहाय्यक वनसंरक्षक डी. पी. देशमुख, आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बोढे आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त झालेले देलनवाडीचे वनपरिक्षेत्राधिकारी एम. ए. कोमट, आरमोरीचे क्षेत्रसहायक एम. पी. ठाकरे यांचा सपत्निक शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नव्याने रूजू झालेल्या वन कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक वनरक्षक नितिन गडपायले, संचालन इंजेवारीचे वनरक्षक जी. टी. वाढई तर आभार वैरागडचे क्षेत्रसहायक बी.एन. चिडे यांनी मानले. कार्यक्रमाला वनकर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सेवानिवृत्तीनंतर समाजसेवा करावी
By admin | Updated: July 5, 2014 00:45 IST