लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने आता नागरिक लसीकरणाकडे वळत आहेत. पण काही ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. आतापर्यंत ४० हजार लोकांनी लस घेतली. लसीकरणासाठी लोक पुढाकार घेत असल्याने केंद्रही वाढविण्यात आले आहेत; पण काही ठिकाणी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध न झाल्याने लसीकरणात खोळंबा येत आहे.जिल्ह्यात सध्या ७० केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. त्यातील आठ केंद्र गडचिरोली शहरातच आहेत. त्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा महिला व बालरुग्णालय, दोन खासगी रुग्णालये असे चार केंद्र होते. आता आणखी चार केंद्र वाढविण्यात आले आहेत. त्यात हनुमाननगर शाळा, लांझेडा येथील शाळा, गोकुल नगरातील शाळा आणि वाकी येथील उपकेंद्राचा समावेश आहे. याशिवाय नऊ ग्रामीण रुग्णालये, तीन उपजिल्हा रुग्णालये आणि ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे.आतापर्यंत लस घेतलेल्या नागरिकांमध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकच आघाडीवर आहेत. त्यांची संख्या १४ हजार ४५६ आहे. ४५ ते ६० वर्ष वयोगटातील ११ हजार ६७६ जण तर फ्रंटलाइन वर्कर म्हणून सेवा देणाऱ्या १२ हजार ७३२ जणांनी लस घेतली आहे. अजून ३ ते ४ हजार फ्रंटलाइन वर्कर लसीकरणासाठी पुढे आलेले नाहीत.
१६ हजार लसी शिल्लक? जिल्ह्यात कोविशिल्ड लस १२ हजार, तर कोव्हॅक्सिन लस चार हजारच्या घरात शिल्लक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. असे असताना काही केंद्रांवर लसीअभावी काम ठप्प कसे पडले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही लस ८० टक्केपर्यंत कोरोनापासून बचाव करू शकते. शिवाय लस घेतल्यानंतर कोरोनाची बाधा झालीच तर त्याची तीव्रता कमी होते, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
- तर लसीचा तिसरा डोसही देणारकोरोनाच्या दोन लसी घेतल्यानंतर त्यांचा परिणाम किती दिवस कायम राहतो याचे निरीक्षण केले जात आहे. त्यामुळे दोन डोसनंतर सहा महिन्यांनी पुन्हा लसीचा तिसरा डोस दिला जाण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.