ग्रामपंचायतच्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत घाटी ग्रामपंचायतच्या अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता राखीव असलेल्या जागेवर हरिराम कोटनाके हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते, तर रंजना सहारे अनुसूचित जाती (महिला) राखीव जागेवर अविरोध निवडून आल्या होत्या. यानंतर त्यांची अनुक्रमे सरपंच व उपसरपंच पदावर निवड झाली.
दरम्यान, गावातील मुरलीधर कवाडकर यांनी सरपंच कोटनाके व उपसरपंच सहारे यांचे सासऱ्याच्या नावे शासकीय जागेवर (शेतजमिनीवर) अतिक्रमण असून, त्याचा उपभोग त्यांचे कुटुंब घेत असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी दि २६ मार्च २०२१ रोजी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीची दखल घेत दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन आणि तथ्याची तपासणी करून जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दोघांचेही ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश दिला.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(१) (ज-३) प्रमाणे ज्या व्यक्तीने शासकीय जमिनीवर किंवा शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे, अशी व्यक्ती पंचायतीचा सदस्य असणार नाही, या तरतुदीचा आधार घेत हा निर्णय घेण्यात आला.