अहेरी : ‘साथ जीयेंगे साथ मरेंगे’ ही प्रेमाची भाषा सहसा आपणास ऐकवयास मिळते. मात्र प्रेम या पवित्र शब्दाला काळीमा फासणारी एक घटना कासमपल्लीच्या घनदाट जंगलात घडली. एका वनरक्षकाने आपल्याच प्रेयसीची गळा आवळून हत्या करुन तिचा मृतदेह लाकडी बिटांवर ठेवून जाळून टाकला. अहेरी तालुक्यातील दिनाचेरपल्ली येथे राहणाऱ्या मनोज सखाराम सडमेक हा महाविद्यालयीन शिक्षण अहेरीत घेत होता. तर भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथिल संगिता जोगा मडावी ही सुद्धा अहेरीत महाविद्यालयिन शिक्षण घेत होती. दरम्यान या दोघांची एकमेकांशी ओळख झाली. पुढे दोघे एकमेकांशी बोलु लागले व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमाने चांगलाच बहर रंगवायला सुरुवात केली. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. मध्यंतरी मनोजला वनविभागात वनरक्षक या पदाची शासकीय नोकरीसुद्धा लागली. प्रेमप्रकरणाची बाब संगीताच्या कुटुंबियांना कळाली व त्यांनी मनोजला लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा मनोजने सहमती दर्शवित लग्नाची तयारी दाखविली. त्यानंतर नोव्हेंबर २०१३ मध्ये संगीताच्या कुटुंबियांनी मनोजच्या प्रेमप्रकरणाची व लग्नाचीही माहिती मनोजच्या कुटुबियांना दिली.दोघांच्या कुटुंबियांनी लग्नासाठी होकार दिला होता. मनोजच्या कुटुंबीयांनीसुद्धा संगीताच्या हेमलकसा येथील घरी जावून भेट घेतली. मात्र पैसे व मनुष्यबळाच्या अभावी लग्नाची तारीख निश्चित झाली नाही व लग्न पुढे ढकलण्यात आले. आज ना उद्या लग्न होईलच या आशेवर संगीता आपल्या भावी वैवाहीक जिवनाची स्वप्ने पाहत होती. काही महिने गेल्यानंतर संगितानी मनोजला लग्नाबाबत विचारणा केली तेव्हा आज उद्या करीत मनोज चालढकल करीत होता. मनोजच्या मनात काही वेगळेच सुरू आहे, याची जाणीव संगीताला झाली. तरीही संगीताची यासंबंधी विचारणा सुरूच होती. लग्नासंबंधी घरच्यांशी चर्चा होवून एक वर्षाचा काळ लोटत आला होता. नोव्हेंबर २०१४ च्या वनविभागाच्या वनरक्षकाच्या भरतीसाठी संगीता ही हेमलकसावरुन गडचिरोलीला गेली. भरती प्रक्रिया आटोपून ती गावाकडे परत जात असताना ७ नोव्हेंबर २०१४ ला आलापल्ली येथील बसस्थानकावर मनोज तिला भेटला व हेमलकसाला गाडीने सोडण्याच्या बहाण्याने भामरागडच्या दिशेने घेवून गेला व ‘ग्लोरी आॅफ फॉरेस्ट आलापली’ जवळील कासमपल्लीच्या जंगलात तिची गळा दाबून हत्या केली व पुरावा नष्ट करण्याचे हेतूने तिचा मृतदेह वनविभागाच्या लाकडी बिटावर ठेवून पुर्णत: जाळून टाकला व त्यानंतर तो परत घराकडे निघाला. संगीताच्या कुटुंबियांनी मात्र संगीताचा शोध सुरू केला. तिच्याशी भ्रमणध्वनीवरही त्यांचा संपर्क होत नव्हता. त्यानंतर लगेच तीन दिवसानंतर मनोजच्या कुटुंबियांनी संगीताच्या वडीलाशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व १२ नोव्हेंबर साक्षगंधाची तयारी दर्शविली मात्र संगीताचे वडील त्यांच्या लहान मुलीला सोडण्याकरिता पुणे येथे गेले होते, ही बाब माहित असताना देखील मनोजचे कुटुंबीय हेमलकसा येथे गेले मात्र तिकडे संगीताचा काही थांगपत्ता नव्हता. एका वर्षापासून टाळाटाळ करणाऱ्या मनोजने संगीता बेपत्ता होताच अचानक लग्नाची तयारी दर्शविली. येथूनच मनोजवर संशयाची सुई फिरू लागली. त्यानंतर संगीताच्या कुटुंबियांनी मनोजवर संगीताच्या अपहरण प्रकरणी तक्रारही दाखल केली. तक्रार दाखल होताच भामरागड व अहेरी पोलिसांचे तपास चक्र मनोजच्या भोवती फिरू लागले. पोलिसांनी वनरक्षक असलेल्या मनोज सडमेकला ताब्यात घेतले व त्याला पोलिसी हिसका दाखविताच मनोज पोपटासारखा बोलू लागला. आलापल्लीवरून संगीताला आपण भामरागडकडे वाहनावर बसवून नेले व कारसपल्लीच्या जंगलात तिचा खून करून वनखात्याच्या बिटावर तिला जाळून टाकले, अशी धक्कादायक माहिती त्याने पोलिसांना दिली. या घटनास्थळावरून पोलिसांना संगीताच्या हाडाचे तुकडेही मिळाले आहे. आता पोलिसांचा तपास अधिक वेग धरत आहे. (प्रतिनिधी)
प्रेमप्रकरणातून झाली संगीताची हत्या
By admin | Updated: December 18, 2014 01:05 IST