लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रेमडेसिविर हे कोरोनावर रामबाण औषध आहे. या इंजेक्शनमुळे रुग्ण बरा होतो. गंभीर रुग्णाचा मृत्यू होत नाही किंवा फुफ्फुसातील संसर्ग कमी होतो, हा जनतेमधील गैरसमज आहे. हे औषध कोरोनासाठी प्रभावशाली नसून, वैद्यकीय क्षेत्रात इतर औषधे याहीपेक्षा उपयुक्त ठरत आहेत, असा दावा करत रुग्णाच्या नातेवाईकांनी रेमडेसिविर मिळत नाही म्हणून भयभीत होऊ नये, असे आवाहन सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.पी. कलंत्री यांनी केले.रेमडेसिविर हे इंजेक्शन कोरोना रुग्णांचा मृत्युदर कमी करणे, रुग्णाला व्हेंटिलेटर लागण्यापासून वाचविणे किंवा आयसीयूमधील रुग्णाचे दिवस कमी करणे तसेच फुफ्फुसातील संसर्ग थांबविणे यापैकी कोणत्याही कारणासाठी उपयुक्त ठरत नसल्याचे त्यांनी संशोधनाअंती म्हटले आहे. जगातील २८ देशांमध्ये झालेल्या संशोधनातून जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा रेमडिसिविर उपयुक्त नसल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियाने या औषधाबद्दल समाजात गैरसमज पसरविला आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आणि रेमडिसिविर मिळत नाही, म्हणजे आता मृत्यू अटळ आहे, असा भ्रम लोकांमध्ये तयार होणे भीतीदायक आहे. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांवर रेमडेसिविर देण्यासाठी दबाव आणतात. रेमडेसिविरशिवाय इतर अनेक औषधांमुळे कोविड रुग्ण बरा होतो. सेवाग्राम रुग्णालयात अनेक वृद्ध रुग्णसुद्धा रेमडेसिविरचा उपयोग न करताच पूर्णपणे बरे झाले आहेत, असेही डॉ.कलंत्री यांनी स्पष्ट केले.