गडचिरोली : १ जानेवारी रोजी गुरूवारला आलेल्या अवकाळी पावसाचे पाणी जिल्हाधिकारी कार्यालयामागील बॅरेकमधील सरकारी कार्यालयांमध्ये घुसल्याने लाखो रुपयांचे साहित्य निरुपयोगी झाले असून, महत्त्वाचे दस्तऐवजही खराब झाले आहेत़ सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शासनाला लाखोंचे नुकसान झाले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयामागे दोन बॅरेक आहेत़ पहिल्या बॅरेकमध्ये कृषी विभाग, सामाजिक वनिकरण विभाग, निरंतर शिक्षण विभाग, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व अन्य कार्यालये आहेत़ जिल्हा निर्र्मिती झाल्यानंतर म्हणजे सुमारे ३० वर्षांपूर्वी हे बॅरेक तयार करण्यात आले़ तेव्हापासून या कार्यालयांच्या डागडुजीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले़ आता या बॅरेकचे सिमेंट पत्रे बदलून फायबर पत्रे लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ १ जानेवारी रोजी ढगाळ वातावरण असतानाही सिमेंट पत्रे काढण्यात आले़ मात्र, काम पूर्ण न झाल्याने अनेक कार्यालयांचे छत उघडेच होते़ संध्याकाळी अचानक पावसाने हजेरी लावली़ यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालय, निरंतर शिक्षण विभाग, सामाजिक वनिकरण विभाग व आरोेग्य विभागाच्या पाणी गुणवत्ता प्रयोेगशाळेत पावसाचे पाणी घुसले़ यामुळे ही चारही कार्यालये पावसाने जलमय झाली़ जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सुमारे लाखो रुपयांचे नवीन संगणक व अन्य साहित्य पावसामुळे निरुपयोगी पडले़ शिवाय महत्त्वाचे दस्तऐवजही ओले झाल्याने खराब झाले आहेत़ जिल्हा उपनिबंधक यांच्या कक्षाची दोन दिवसांपूर्वीच डागडुजी करण्यात आली़ परंतु त्यांच्या कक्षाचीही बरीच नासधूस झाली़ तेथील संगणकही निकामी झाला़ या बॅरेकमधील खिडक्यांची तावदाने फुटल्याने पावसाळ्यात पाणी आत शिरत असते़ शिवाय साप, विंचू यासारखे विषारी प्राणीही आत प्रवेश करीत असतात़ दोन दिवसांपूर्वीच एका मोठ्या विंचवाने प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना दर्शन दिले होेते़अद्यापही सामाजिक वनिकरण विभागाच्या एका खोलीत छताला दोन-तीन ठिकाणी भगदाड पडलेली आहेत़ पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानंतर गुरूवारला रात्री छतावर ताडपत्री झाकण्यात आली़ परंतु खराब झालेले संगणक, अन्य उपकरणे आणि महत्त्वाचे दस्तऐवज यांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)
शासकीय कार्यालयात शिरले पावसाचे पाणी
By admin | Updated: January 3, 2015 01:11 IST