लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील चार दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण असून अधूनमधून कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांची तारांबळ उडाली आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीपासून आॅगस्ट महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. त्यानंतर मात्र पावसाने कायमची दडी मारली. आॅक्टोबर महिन्यात धानपिकासाठी पावसाची गरज होती. मात्र पाऊस पडला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांचे धान करपले. काही शेतकऱ्यांनी नदी, नाल्यांना डिझेल इंजिन, मोटार पंप लावून धानपीक वाचविले.धानाची कापणी संपली असून मळणीला सुरुवात झाली आहे. मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्याच्या काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. या अकाली पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. बऱ्याच ठिकाणी धान मळणीचे काम ठप्प पडले आहे. शेतकऱ्यांनी धानाचे पुंजणे झाकून ठेवले आहेत. जोपर्यंत ढगाळ वातावरण जाणार नाही, तोपर्यंत मळणीची कामे बंदच राहणार आहेत.पोपट, तूर, मिरची व इतर भाजीपाला पिकांना फुलबार येत आहे. पहाटेच्या सुमारास प्रचंड प्रमाणात धुके पडत असल्याने पिकांचे फुल झडण्याची समस्या वाढली आहे. यामुळे उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.बुधवारी रात्री आष्टी परिसरात गुरूवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास वादळवाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे आष्टी-घोट मार्गावर अडपल्ली गावाजवळ रस्त्याच्या मधोमध झाड कोसळले आहे. वाहनचालकांना रस्त्याच्या बाजूने वाहन काढावे लागत होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती.रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. ही पिके आता वाढीला लागली आहेत. अशातच पाऊस झाल्याने या पिकांना मात्र फायदा होण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे अनेकांच्या प्रकृतीवरही परिणाम झाला आहे.बाजार समिती व आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धानाची आवक वाढली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकºयांचे धान भिजले आहे. ताडपत्री झाकून पावसापासून धानाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हे प्रयत्न अपुरे पडत असून काही शेतकºयांचे धान भिजले असल्याचे चित्र दिसून येत आहे.अहेरीत सर्वाधिक पाऊसमागील २४ तासात अहेरी तालुक्यात सर्वाधिक २०.५ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुलचेरा तालुक्यात २ मिमी, सिरोंचा तालुक्यात १७.६ मिमी, एटापल्ली ५.५ मिमी व भामरागड तालुक्यात ५.५ मिमी पाऊस पडला आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने आणखी पाऊस होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:30 IST
मागील चार दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण असून अधूनमधून कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून आॅगस्ट महिन्यापर्यंत पाऊस पडत होता.
जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच
ठळक मुद्देढगाळ वातावरण कायम : धान मळणीची कामे थांबली, खरीप पिकांवर विपरित परिणाम