गडचिरोली : पृथ्वी, वायू, जल, आकाश व अग्नी हे निसर्गाचे अविभाज्य घटक असून ही पंचमहाभूते म्हणून ओळखले जातात. त्या दृष्टीने निसर्गाचे रक्षण करणे ही काळाची गरज असून शहरातील नागरिकांनी रक्षण करावे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष याेगिता पिपरे यांनी केले.
नगर परिषद प्रशासनाच्या वतीने शनिवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
राज्य शासनाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शहरातील प्रदूषण कमी हाेण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा व पर्यावरणाचेे संतुलन राहावे, असा संदेश देण्यासाठी ही सायकल रॅली काढण्यात आली. नगर परिषद कार्यालयातून रॅलीस प्रारंभ होऊन इंदिरा गांधी चौकापर्यंत पर्यावरण व प्रदूषण मुक्त गडचिरोली, अशी घोषणा देत जनजागृती करण्यात आली.
यावेळी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, प्रभारी मुख्याधिकारी माधुरी सलामे, उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारवार, अग्निशमन पर्यवेक्षक अनिल गोवर्धन, कार्यालयीन अधीक्षक मधुकर कन्नाके, आरोग्य विभागाचे राजेश मधुमटके, तृप्ती व इतर कर्मचारी उपस्थित होते.