गेवर्धा, गुरनोली व खेडेगाव विद्युत फिडरवर १६ तासांचे भारनियमन सुरू करण्यात आल्याने परिसरातील ४०० पेक्षा अधिक कृषिपंपधारक शेतकरी अडचणीत आले होते. रबी हंगामात धानाची लागवड या परिसरात करण्यात आली. धानाला अधिक पाण्याची गरज असताना ऐन हंगामात १६ तासांचे भारनियमन सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे धान पीक करपण्याचा धोका होता. यासंदर्भात बुधवारी मुंबई मंत्रालयात आ.कृष्णा गजबे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, माजी जि.प.उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जीवन नाट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व्यंकटी नागीलवार यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे व उर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेत त्यांच्यासमाेर शेतकऱ्यांची व्यथा मांडत भारनियमन आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संबंधित यंत्रणेला ३१ मे पर्यंत भारनियमन न करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
१६ तास भारनियमनाच्या आदेशाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST