लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) सरचिटणीस व माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजू (७०) याच्या स्मरणार्थ १० जून रोजी माओवाद्यांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. नक्षलप्रभावित भागात पोलिस अलर्ट मोडवर होते, पण नागरिकांनी हा बंद झुगारून लावत आपले व्यवहार सुरळीत ठेवले.
२१ मे रोजी छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत २७ माओवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले होते. यात माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजू याचाही समोवश होता. माओवाद्यांचा केंद्रीय समिती सदस्य भूपती ऊर्फ अभय याने २८ मे रोजी पत्रक जारी करून सरकार व पोलिसांबद्दल आगपाखड केली होती. १० जून रोजी भारत बंदची हाक दिली होती. यासोबतच ११ जून ते ३ ऑगस्टदरम्यान बसवा राजू आणि इतर मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतीत 'स्मारक सभा' आयोजित करण्याचे आवाहनही केले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर होती.
सीमावर्ती भागात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे वॉचदरम्यान, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर गस्त घालताना छत्तीसगडच्या बस्तरमध्ये माओवाद्यांनी ९ जून रोजी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरेपुंजे (४६) हे शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर तेलंगणा, छत्तीसगड या सीमावर्ती भागात हायअलर्ट जारी करण्यात आला होता. गडचिरोली पोलिसांनी माओवादविरोधी अभियान गतिमान केले होते. ठिकठिकाणी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करून माओवाद्यांच्या हालचाली टिपल्या जात होत्या. मात्र, सुदैवाने कोठेही अप्रिय घटना घडली नाही.