सेविकांमध्ये नाराजीचा सूर : महागाईचा फटकामानापूर/देलनवाडी : स्तनदा तसेच गरोदर मातांना सकस आहार देण्याची योजना बालविकास विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने अंगणवाड्यांमार्फत सुरू केली आहे. मात्र वाढत्या महागाईत सदर योजना मुळीच परवडणारी नसल्याचा सूर अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये आहे. सुदृढ बालकांचा जन्म व्हावा, या उद्देशाने ही योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. गरोदर व स्तनदा मातांना सोमवार ते शनिवार या कालावधीत अन्नघटकनिहाय, उष्मांक, प्रथीने, लोह, मेद याचे प्रमाण असलेला आहार देण्याबाबत यात सूचविण्यात आले आहे. चपाती, भाकरी, तांदूळ, कडधान्य, डाळ, शेंगदाना लाडू, साखर, गुळ, खाद्यतेल, आयोडिनयुक्त मीठ, अंडी, केळी, नाचणी आदी घटक असलेला आहार देण्याबाबत निर्देश आहेत. शासनाकडून प्रतिमहिना २५ रूपये यासाठी देण्यात येतात. परंतु महागाईच्या काळात २५ रूपये प्रतिमहा असलेली आर्थिक तरतूद कमी पडत आहे. त्यामुळे ही योजना राबवायची कशी, हा प्रश्न अंगणवाडी महिलांना पडला आहे. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी या योजनेत अंगणवाडीमार्फत आहार पुरवठ्याबाबत सक्ती केली आहे. महागाईच्या फटक्यामुळे २५ रूपयांत एवढे पदार्थ पुरविणे अतिशय कठीण जात आहे. अतिरिक्त भार कर्मचाऱ्यांवर येणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविका अडचणीत येत आहे. (वार्ताहर)
न परवडणारी योजना लादली अंगणवाड्यांवर
By admin | Updated: December 4, 2015 01:42 IST