हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : तिरंगा रॅलीचा समारोपगडचिरोली : पूर्वीच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडे विकासात्मक दृष्टी नव्हती. तसेच नियोजनबद्ध कार्यक्रमही नव्हता. त्यामुळे मागील काळात देशाची आर्थिक पिछेहाट झाली. मात्र विकासदृष्टी असलेल्या नरेंद्र मोदी यांनी भारताची सूत्रे स्वीकारल्यानंतर अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या. विद्यमान केंद्र सरकारच्या दोन वर्षांच्या काळात देशातील खाणीतून भारताला ३ लाख ३० हजार कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मेक इन इंडिया, स्किल इन इंडियाच्या माध्यमातून भारताची संपन्नतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. तसेच केंद्र शासनाकडून आतंकवाद व नक्षलवाद संपविण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहे, त्यामुळे देश सुरक्षितता व संपन्नतेकडे वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वातंत्र्य दिनापासून तिरंगा रॅली हा कार्यक्रम सुरू आहे. त्याचा समारोप गुरूवारी नामदार अहीर यांच्या उपस्थित गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात झाला. यावेळी ते जाहीर सभेत बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. या कार्यक्रमाला आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, चंद्रपूर जि. प. च्या अध्यक्ष संध्या गुरनुले, प्रकाश पोरेड्डीवार, नाना नाकाडे, किसन नागदेवे, रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम, चंद्रपूरच्या जि. प. सदस्य ताराबाई कोटगले, स्वप्नील वरघंटे, प्रकाश अर्जुनवार, अनिल फुलझेले, मोतीलाल कुकरेजा, देसाईगंजचे नगराध्यक्ष श्याम उईके, विलास भांडेकर, शशिकांत साळवे, अनिल पोहणकर, रामेश्वर सेलुकर, डॉ. भारत खटी, रवींद्र बावनथडे, प्रशांत भृगुवार, दामोेदर अरगेला, बबलू हुसैन आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना ना. अहीर म्हणाले, प्रत्येक भारतीयांच्या मनात देशभक्ती जागृत करण्याच्या उद्देशाने भारतभर तिरंगा यात्रेचा कार्यक्रम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. आता सरकारच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील शूरवीरांचा व क्रांतिकारांचा ६०० पानांचा सोनेरी इतिहास लिहिल्या जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात दौरे करून भारताशी परकीयांचा संबंध वाढविला. तसेच परकीय गुंतवणूक भारतात मोठ्या प्रमाणात वाढविली. केंद्र सरकारच्या वतीने सीमा सुरक्षा वाढविण्यात येणार असून त्या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. देशातील आतंकवाद, नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकार ठोस पावले उचलत आहे, असेही ना. अहीर यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद पिपरे, संचालन प्रशांत वाघरे यांनी केले तर आभार रवींद्र ओल्लालवार यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)
देशाची सर्वदृष्ट्या सक्षमतेकडे वाटचाल
By admin | Updated: August 26, 2016 01:08 IST