गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात सध्या महायुती व आघाडीमध्ये राज्यस्तरावरील घडामोडीमुळे धास्तीची भावना आहे. शिवसेना, भाजपमध्ये युती होते किंवा नाही, याची स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही चर्चा आहे. दोघांनीही वेगळी चूल मांडल्यास त्यादृष्टीने नियोजन करावे लागेल, असा सूर उमटत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आघाडीवरून राज्यपातळीवर धुसपूस सुरू आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्यासाठी तयारीत आहे. तसाही पक्षाने चामोर्शी येथे काँग्रेसच्या वाट्यातील मतदार संघात मेळावा घेऊन याचे सुतोवात करून दिले होते. एकूणच राज्यपातळीवरील घडामोडीमुळे जिल्ह्याचे वातावरण तापलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, अहेरी, गडचिरोली हे तीन मतदार संघ आहेत. तिनही मतदार संघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत आरमोरी व गडचिरोली हे दोन मतदार संघ काँग्रेसकडे तर अहेरी हा विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. भाजप-शिवसेना युतीच्या समीकरणात गडचिरोली व अहेरी हे भाजपकडे तर आरमोरी विधानसभा क्षेत्र हे शिवसेनेकडे आहे. आजवर आघाडी व युती राहत आल्याने या मतदार संघांमध्ये यावेळीही अशीच वाटणी होईल, असे सर्वच पक्षाचे राजकीय जाणकार सांगतात. सध्या भाजपने अहेरी विधानसभा क्षेत्रात निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे. येथे नाग विदर्भ आंदोलन समितीसोबत लोकसभा निवडणुकीपासूनच भाजपने घरोबा केला आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवार येथे मैदानात राहील. राष्ट्रवादी काँग्रेसही येथे तयारीला लागली आहे. तर विद्यमान अपक्ष आमदार पुन्हा मैदानात उतरण्यासाठी पुन्हा समशेर पाजळून आहेत. येथे तिरंगी लढतीचे चित्र असले तरी बहुजन समाजपार्टी ही आपला उमेदवार मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. गडचिरोली विधानसभा मतदार संघात विद्यमान काँग्रेस आमदारांना तिकीटासाठी जोरदार संघर्ष करावा लागत आहे. येथून माजी खासदारांचेही नाव तिकीटासाठी दावेदार म्हणून आघाडीवर आहे. भाजपकडेही गडचिरोलीत इच्छुकांची मोठी गर्दी आहे. पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळते, हे सांगणे कठीण असल्याचे कार्यकर्ते म्हणतात. मात्र भाजपकडे दोनच नाव प्रामुख्याने आहेत. व या नावावर संघ मुख्यालयातूनही शिक्का मोर्तब झाले, अशी चर्चा आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. तरीही सेनेचे माजी आमदार उमेदवार म्हणून तयारीला लागले आहेत. काँग्रेसकडे उमेदवार म्हणून विद्यमान आमदारच प्रबळ दावेदार आहे. त्यांना उमेदवारीही मिळेल, अशी चिन्ह आहे. एकूणच अद्याप महाराष्ट्राचे आघाडी व युतीचे चित्र स्पष्ट झालेले नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, शिवसेना साऱ्या जागांवर लढण्यासाठी चर्चा करीत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मैदानात उतरण्याची शक्यता आहे. एकूणच हे सारे चित्र २० तारखेपर्यंत स्पष्ट होईल.लोकसभा निवडणुकीतून काँग्रेस-राकाँ आघाडी अद्यापही सावरलेली नाही. मात्र महायुती प्रचाराला प्रारंभ करण्याच्या तयारीत आहे. जोपर्यंत आघाडी व युतीमध्ये अधिकृतरित्या घोषणा होत नाही, तोपर्यंत ही धुसफूस सुरूच राहील, असे कार्यकर्ते म्हणतात. (जिल्हा प्रतिनिधी)
आघाडी आणि युतीमध्ये धास्तीच अधिक
By admin | Updated: September 17, 2014 23:49 IST