मुन्ना कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कव्यंकटापूर : अहेरी तालुक्याच्या व्यंकटापूर परिसरात अनेक गावे आहेत. या गावांमध्ये बसफेरी काही वर्षांपर्यत सुरू होती; परंतु खराब रस्त्याचे कारण दाखवून या मार्गावरील बसफेरी बंद करण्यात आली, तेव्हापासून अद्यापही व्यंकटापूर-आवलमरी-रेगुंठा बसफेरी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. या मार्गे बसफेरी सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.अहेरी-व्यंकटापूर-आवलमारी-रेगुंठा बस सेवा काही वर्षांपूर्वी सुरळीत चालू होती. मात्र सदर मार्गावरील रस्ता पेद्दावट्रा- रेगुंठापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब असल्याचे कारण दाखवून या मार्गावरील बसफेरी बंद करण्यात आली. सध्या या मार्गाचे खडीकरण, डांबरीकरण झाले आहे. रस्ता सुस्थितीत आहे. पक्का रस्ता तयार झाल्याने रहदारीही वाढली आहे. त्यामुळे या मार्गावरील बसफेरी सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.विशेष म्हणजे, आगर व्यवस्थापकांना निवेदन देऊन बस सेवाफेरी सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर बसफेरी सुरू करण्याच्या मागणीचा ठराव ग्रामस्थांनी ग्रामसभेत मंजूर करून तो आगर व्यवस्थापकांना पाठविला. परंतु अद्यापही बसफेरी सुरू झाली नाही. दुर्गम भागातील नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्याकडे आगार प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. व्यंकटापूर, आवलमरी, रेगुंठा परिसरात बसफेरी सुरू न केल्यास चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या मार्गे बसफेरी सुरू करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.रूग्णांच्याही हालअपेष्टाव्यंकटापूर व रेगुंठा भागात वाहतुकीची कोणतीही साधने उपलब्ध नाहीत. या परिसरातील नागरिकांना पायी तसेच खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. अनेकदा नागरिक पायी अहेरीपर्यंत पायवाटेने जंगलातून येतात. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो. त्यांना साधने उपलब्ध होत नाही. रुग्णांनासुद्धा वेळीच साधने मिळत नाही. त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. प्रसंगी वाटेतच रुग्ण दगावल्याच्या घटना या भागात घडल्या आहेत. व्येंकटापूर, आवलमारी, रेगुंठा या परिसरात बस सेवा सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांसाठी सोय होईल. जंगलातून तसेच पायवाटेने नागरिक ये-जा करतात, तेही थांबण्यास मदत होईल.
बसफेरीअभावी पायपीट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 5:00 AM
खराब रस्त्याचे कारण दाखवून या मार्गावरील बसफेरी बंद करण्यात आली, तेव्हापासून अद्यापही व्यंकटापूर-आवलमरी-रेगुंठा बसफेरी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. या मार्गे बसफेरी सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
ठळक मुद्देआवलमरी परिसरातील नागरिक संतप्त : बसफेरी सुरू न केल्यास आंदोलन करणार