योजना जनतेपर्यंत पोहोचवासिरोंचा : केेंद्र व राज्य शासनाच्या वतीने सामान्य जनतेसाठी शेकडो योजना राबविण्यात येत असून या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. सिरोंचा येथे आढावा बैठकीचे आयोजन बुधवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, प्रकाश गेडाम, बाबुराव कोहळे यांच्यासह तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व सिरोंचा येथील नागरिक उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाने मागील एक वर्षाच्या कालावधीत विविध जनकल्याणकारी योजना राबविल्या आहेत. मात्र दुर्गम भागातील नागरिकांना या योजनांची माहिती नाही. त्यामुळे बहुतांश नागरिक योजनांपासून वंचित असल्याचे चित्र दुर्गम व ग्रामीण भागात दिसून येते. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांना आवश्यक असलेली मदतही दिली पाहिजे. शासकीय यंत्रणेने शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम केले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना व पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या दोनही योजना नागरिकांना अत्यंत कमी पैशामध्ये विम्याचे संरक्षण देत आहेत. त्यामुळे या योजनांची जास्तीत जास्त माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. सदर विमा बँकेच्या मार्फत काढला जात असला तरी या योजनांची माहिती शासकीय कर्मचाऱ्यांनीसुद्धा द्यावी, असे मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्र्यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. अपूर्ण असलेली कामे अधिकाऱ्यांनी पूर्ण करावी, काही दिवसांतच शेतीच्या हंगामाला सुरूवात होणार असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, शेतकऱ्यांची गैरसोय झाल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिला. (शहर प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांचे आवाहन : सिरोंचा येथे आढावा बैठक
By admin | Updated: June 5, 2015 01:37 IST