देसाईगंज : गाढवी नदी परिसरातील शेतजमीन भाजीपाला पिकासाठी सुपीक मानली जाते. त्यामुळे या परिसरातील अनेक शेतकरी भाजीपाला व मिरची पिकाची लागवड करतात. कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून मिरचीची ओळख आहे. या परिसरात शेकडाे हेक्टरवर मिरची पिकाची लागवड झाली आहे.
गोंदिया जिल्ह्यातून येणारी गाढवी नदी देसाईगंज तालुक्यात बोळधाजवळून प्रवेश करते. या नदीच्या दोन्ही काठाजवळ बोळधा, कोरेगाव, एकलपूर, चोप, विसोरा, शंकरपूर, विठ्ठलगाव, पोटगाव, तुळशी, कोकडी, झरी, फरी, विहिरगाव, किन्हाळा, मोहटोला, अरततोंडी, उसेगाव या गावांतील शेतकऱ्यांची शेतजमीन आहे. नदीकाठची जमीन वारवशी (वाळू, माती मिश्रित) असून ही जमीन मिरची पिकासाठी पोषक आहे.
देसाईगंज तालुक्यात सुमारे चारशे हेक्टर जमिनीवर कारली, टमाटर, कोबी, चवळी, भेंडी, वांगी ही इतर सर्व भाजीपाला पीके घेतली जातात. त्यातील काही हेक्टरवर मिरची पिकाचा समावेश आहे.
बोळधा व विसाेरा येथील बहुतांश शेतकरी मिरची पिकाची लागवड करतात. काही शेतकरी हिरवी मिरची तर काही वाळलेली लाल मिरची विकतात. हिवाळ्यात भाजीपाला व मिरची पिकाचा भाव कमी हाेते. त्यामुळे कमी किमतीत मिरची विकावी लागते. परिणामी काही शेतकरी हिरवी मिरची न विकता वाळलेली मिरची विकतात. वाळलेली मिरची खराब हाेत नसल्याने वर्षभर साठा करून गरजेनुसार व भाव बघून विकता येते.