अनेक शेतकरी शेताच्या बांधावर असलेल्या झाडांची तोड करून या झाडांचा उपयाेग सरपणासाठी करीत आहेत. मात्र दिवसेंदिवस शेत शिवारात असणारी झाडे संपुष्टात येत आहेत. पैशाच्या गरजेपोटी अनेक शेतकरी आपल्या शेतात असलेल्या बाभूळ झाडाची विक्री करीत आहेत. जिल्ह्याबाहेरील अनेक व्यापारी स्थानिक लोकांशी संपर्क करून बाभूळ झाडाचे लाकूड खरेदी करीत आहेत. त्यामुळे सरपणासाठी जळाऊ लाकडे उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे. पावसाळ्यात सरपणाची अडचण भासू नये म्हणून शेतकरी महिला गुराढोरांच्या शेणाचा वापर करून गोवऱ्या तयार करीत आहेत. मात्र अलीकडच्या चार-पाच वर्षाच्या काळात पाळीव जनावरांची संख्या कमी झाल्याने शेणाचा तुटवडा जाणवत आहे. ग्रामीण भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात गोधन हाेते. त्यामुळे गोवऱ्या अधिक आढळून येत होत्या. मात्र अलीकडच्या चार-पाच वर्षात पाळीव जनावरांची संख्या कमी झाल्याने शेणाचा तुटवडा जाणवत आहे.
तालुक्यातील चाकलपेठ, मुरखळा मुख्य रोडच्या बाजूला एका शेतात शेतकरी महिला गोवऱ्या तयार करीत आहेत. त्याचा वापर इंधन म्हणून केला जात आहे. गोवऱ्या थापून त्या उन्हात कडक वाळवून घरी आणल्या जातात. त्यांचा उपयाेग चूल पेटविण्यासाठी केला जात आहे.
बाॅक्स ......
गॅस सिलिंडर पडले अडगळीत
अलीकडे शासनाने महिलांच्या आरोग्याची काळजी घेत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबांना सवलतीच्या दरात गॅस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र बऱ्याच कुटुंबांना गॅस सिलिंडर भरण्यासाठी दरवाढीचा फटका बसत आहे. तसेच सदर योजनेतील गॅस कनेक्शन धारकांना सिलिंडरवर सबसिडी मिळत नसल्याने सिलिंडरसाठीची पूर्ण रक्कम अदा करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य गरीब कुटुंबांना गॅस सिलिंडर परवडत नाही. चामोर्शी शहर व परिसरात जळाऊ लाकूड बीट उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.