गडचिरोली : राज्यभरातील राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. चवथ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. त्यामुळे रूग्णांना आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले आहे. विशेष करून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने रूग्ण व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेतर्फे १ महिन्यापूर्वी कामबंद आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी २ जून रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान २००९-१० मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्वलक्षी लाभ देणे, अस्थायी बीएएमएस, डीबीएस यांचे समावेशन करणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करणे, बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावणे, वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे ३ व ६ आगाऊ वेतनवाढीचा लाभ देणे आदी समस्या १० दिवसांच्या आत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र एक महिन्याचा कालावधी लोटूनही यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे राज्यभरातील डॉक्टरांनी ‘डॉक्टर डे’च्या दिवशीपासूनच कामबंद आंदोलनाला सुरूवात केली आहे. डॉक्टर संपावर गेल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालयातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. शहरी भागात खासगी डॉक्टरकडे जाऊन रूग्ण उपचार घेत आहेत. मात्र ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. ग्रामीण भागामध्ये खासगी डॉक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे या रूग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रूग्णालयात जाऊनच उपचार करावे लागतात. मात्र रूग्णालयातील डॉक्टर संपावर गेले असल्याने काही रूग्णांना आल्यापावली परत जावे लागत आहे. पावसाळ्यात विविध साथींचे रोग ग्रामीण भागात पसरतात. नेमक्या याच वेळी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. डॉक्टर उपस्थित असतांनाही रूग्णालये हाऊसफुल राहतात. आता तर संप सुरू आहे. डॉक्टरच नसल्याने बहुतांश रूग्ण घरीच राहणे पसंत करीत आहेत. काही रूग्ण गावठी औषधी घेऊन उपचार करीत आहेत. आंदोलन आणखी काही दिवस चालल्यास आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोेलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने आंदोलनकर्त्या डॉक्टरांशी वाटाघाटी करून तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.आंदोलनात राज्यभरातील सुमारे १२ हजार डॉक्टर सहभागी झाले आहेत. तर गडचिरोली जिल्ह्यातील १२० डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले आहे. जिल्ह्यातील आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी नोकरीचे राजिनामे राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेचे राज्यध्यक्ष यांच्याकडे पाठविले आहेत. ११ जुलैपर्यंत कोणताही तोडगा न निघाल्यास राज्यभरातील डॉक्टर सामूहिक राजिनामे शासनाकडे सादर करणार आहेत. (नगर प्रतिनिधी)
आरोग्य व्यवस्था कोलमडली
By admin | Updated: July 5, 2014 00:46 IST