तलाव दुरूस्तीतून सिंचन क्षेत्र वाढले
सिरोंचा : तालुक्यातील मामा तलावांच्या माध्यमातून धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. येथील बहुतांश तलाव जीर्णावस्थेत पोहोचले होते. त्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाने मामा तलाव व बोड्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले होते. मामा तलावांची दुरूस्ती झाल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे.
पोर्लातील विश्रामगृहाची दुरवस्था कायमच
पोर्ला : तालुक्यातील पोर्ला येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विश्रामगृह बांधण्यात आले. परंतु, या विश्रामगृहाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने विश्रामगृह दुरवस्थेत आहे. पोर्ला हे गडचिरोली तालुक्यातील मध्यवर्ती गाव आहे. येथील विश्रामगृह अतिशय जुने आहे. या विश्रामगृहाच्या देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.
सावरगाव परिसराचा विकास नाही
धानोरा : छत्तीसगड व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सावरगाव परिसरातील गावांचा विकास रखडला आहे. हा परिसर आदिवासीबहुल व नक्षल प्रभावित आहे. याठिकाणी नेमण्यात आलेले कर्मचारी नियमित कर्तव्य बजावत नाहीत. अनेक नागरिकांना शासकीय योजनांची माहिती नाही, त्याबाबत जनजागृती करण्याची मागणी हाेत आहे.
वाकडी-बोरी मार्गावर खड्डे कायम
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाकडी-लखमापूर बोरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून, या रस्त्यांची अवस्था बकाल झाली आहे. वारंवार तक्रार करूनही दुरूस्तीच्या कामाकडे कानाडोळा केला आहे.
गंजलेले व जीर्ण वीजखांब जैसे थे
देसाईगंज : नगर परिषद क्षेत्रात अनेक लोखंडी खांब वाकले आहेत. काही खांब खालच्या बाजूने जीर्ण झाले आहेत. हे खांब कधीही कोसळण्याचा धोका आहे. जीर्ण खांब बदलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कठड्यांअभावी अपघाताची शक्यता
चामोर्शी : गडचिरोली मार्गावरील पोहर नदीत चिचडोह बॅरेजचे पाणी साचले आहे. या नदीवरील पूल अरूंद आहे तसेच या पुलावार लोखंडी कठडे उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे एखादे वाहन कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. या मार्गावरील वर्दळ पाहता पोहर नदीवर कठडे लावावे.
मोहझरीतील रस्त्यांची लागली वाट
गडचिरोली : गडचिराेलीपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. हे रस्ते दुरूस्त करावे, त्याचबरोबर नाले साफ करावेत, अशी मागणी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.
कन्नमवार नगरात डासांचा प्रादुर्भाव
गडचिरोली : शहराच्या कन्नमवार नगरातील अनेक नाले तुंबले असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
कोडसेपल्लीतील समस्या साेडवा
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे गावातील समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
लखमापूर बोरीत गतिरोधकाचा अभाव
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्याच्या लखमापूर बोरी येथील बसस्थानक परिसरातील शिवाजी चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते. चामोर्शी-आष्टी मार्गावर लखमापूर बोरीतील सदर शिवाजी चौक असल्याने येथे गतिरोधकाची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जेणेकरून अपघाताला आळा बसेल.
तालुक्यात अनियमित वीजपुरवठा
देसाईगंज : तालुक्यातील वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तालुक्यातील कुरूड, कोंढाळा, मोहटोला, किन्हाळा आदी कृषिपंपधारक शेतकरी आहेत. सध्या धान पीक जोमात आहे. या शेतकऱ्यांना अनेकदा शेतीला पाणी द्यावे लागते. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.