सिरोंचा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या सिरोंचा शाखेच्या वतीने बुधवारी सकाळी कारसपल्ली गावाजवळ पालकमंत्र्यांना हजारो कार्यकर्त्यांनी घेराव घातला. यावेळी खराब झालेल्या धानाचे पोते रस्त्यावर ठेऊन कार्यकर्ते ठिय्या देऊन होते. पालकमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा सिरोंचाकडे जात असताना कारसपल्ली येथे हे आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री आपल्या गाडीतूनही उतरले नाही. यामुळे पालकमंत्र्यांप्रती तीव्र नाराजी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.पालकमंत्र्यांच्या वतीने कार्यकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे नेते प्रकाश गेडाम यांनाही आविसं कार्यकर्त्यांनी खडे बोल सुनावले. जवळजवळ १५ मिनीट हा वाहनाचा ताफा कारसपल्ली येथे थांबून राहिला. यावेळी पालकमंत्र्यांनी निवेदन घेण्याकरिता गाडीतून उतरण्याचे सौजन्य न दाखविल्याने आविसंचे शेकडो कार्यकर्ते संतप्त झालेत. पालकमंत्री व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात नारेबाजीही करण्यात आली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.यावेळी आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, रवी बोगोंनी, नगराम, कंगाली, अशोक इंगीली, अशोक हरी, लक्ष्मण बोल्लो, ग्रा. पं. उपसरपंच सडवली कुम्मरी, वासु सपाट, सडवली जनगाम, रामु इंगीली, रामु अंबाला, व्यंकटीस्वामी, डॉ. श्रीनिवास गौयकोटी आदी उपस्थित होते. अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांचे निराकरण करण्याबाबत शासन व पालकमंत्री यांच्याकडे वारंवार मागणी करण्यात येत आहे. या समस्यांची सोडवणूक न झाल्यास आदिवासी विद्यार्थी संघटनेकडून उपोषण, आंदोलन व मोर्चाही काढला जाईल, अशी माहिती आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम यांनी यावेळी दिली. (तालुका प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांना आविसंचा घेराव
By admin | Updated: June 4, 2015 01:31 IST