गडचिरोली : गोगाव-अडपल्ली येथील उपसा सिंचन योजना बंद असल्याने या उपसा सिंचन योजनेवर अवलंबून असलेली जवळपास ३७० हेक्टर शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे सदर सिंचन योजना तत्काळ सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी गुरूवारी दुपारी शेकडो शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या पाणी उपसा केंद्राजवळ जमा होऊन जोरदार आंदोलन केले. यावेळी राज्यातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. वैनगंगा नदीच्या तिरावर अडपल्ली व गोगाव या दोन गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन ओलीताखाली आणण्यासाठी उपसा सिंचन योजना बांधण्यात आली. या योजनेची सिंचन क्षमता ६५८ हेक्टर एवढी आहे. प्रत्यक्षात ३७० हेक्टरला पाणी दिले जात आहे. २००९ मध्ये या योजनेचे काम पूर्ण होऊन योजना सुरू झाली. मागील दोन ते तीन वर्षांपासून या योजनेच्या माध्यमातून या परिसरातील शेतकरी धानाचे पीक घेत होते. मागील वर्षी या योजनेत बिघाड निर्माण झाला. उन्हाळ्यात शेतकरी कोणतेच पीक घेत नसल्याने योजना बंद होती. मात्र पावसाळ्यापूर्वी ही योजना सुरू करणे आवश्यक होते. योजना सुरू केली नाही. मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने धानपीक करपण्याच्या मार्गाला लागले आहे. त्यामुळे सदर योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. गोगाव, अडपल्ली येथील शेतकऱ्यांनी गुरूवारी उपसा सिंचन योजनेची पाहणी केली. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, कालिदास गणपत चापले, विधाते, नामदेव खोब्रागडे, दिवाकर बांगरे, मुखरू रायपुरे, भास्कर चौधरी, पुरूषोत्तम म्हशाखेत्री, रामदास खोब्रागडे, सुनील गेडाम उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
गोगाव सिंचन योजना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
By admin | Updated: August 26, 2016 01:19 IST