गडचिरोली : जनकल्याणाच्या उद्देशाने गोरगरिबांना कमीत कमी खर्चात विविध कार्यक्रमांसाठी महसूल विभागामार्फत बांधण्यात आलेल्या शहरातील राजस्व भवनाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. राजस्व भवनाच्या पटांगणात रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा खच पडला असून या राजस्व भवनाचा गैरवापर काही लोक करीत आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. गडचिरोली जिल्हा निर्मितीनंतर १९८३-८४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड यांनी राजस्व भवनाचे बांधकाम केले. सुरूवातीच्या काळात राजस्व भवन गोरगरिबांना विविध कार्यक्रमांसाठी १०० ते १५० रूपयात भाड्याने उपलब्ध करून दिले जात होते. मात्र काही वर्षांपासून राजस्व भवनाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या भवनाची दुर्दशा झाली आहे. राजस्व भवनाच्या पटांगणात रिकाम्या दारूच्या बॉटलच्या पोत्यांचा खच पडला असून तीनचाकी रिक्षाही ठेवल्या जात आहेत. राजस्व भवनाच्या देखभालीकडे लक्ष घालण्याची वारंवार प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे राजस्व भवनाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जनकल्याण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुरेश पद्मशाली यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
राजस्व भवनात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच
By admin | Updated: October 25, 2014 01:20 IST