देसाईगंज : काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका अद्यापही टळला नाही. दरराेज नवीन रुग्ण आढळून येत आहेत. शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अटी व शर्थीनुसार परवानगी दिली असली तरी काेविड-१९ चे नियम धाब्यावर बसवून अनावश्यक गर्दी हाेणारे कार्यक्रम देसाईगंज तालुक्यात सर्रास आयाेजित केले जात आहेत. त्यामुळे काेराेनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. नियमाची कठाेर अंमलबजावणी करावी, अशी मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.देसाईगंज तालुक्यात काेराेनाचे बाधित रुग्ण आढळून येत आहेत. तरी सुद्धा नियमाचे पालन करून सार्वजनिक कार्यक्रम व विवाह साेहळे पार पाडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु काही ठिकाणी आदेशाची पायमल्ली करून सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय पक्षाचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम व लग्न साेहळे आयाेजित केले जात आहेत. यादरम्यान हाेत असलेल्या गर्दीमुळे काेराेनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतेच पाश्चिमात्य देशातून काेराेना नवीन रुपात आपल्या देशात आल्याने अनेक रुग्णही आढळून आले. असे असतानाही गाव पातळीवर परवानगीशिवाय नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न साेहळे व अन्य कार्यक्रम सादर केले जात आहेत. त्यामुळे नियमांची पायमल्ली करून कार्यक्रम सादर करणे अनेकांच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. देसाईगंजला झाडीपट्टी रंगभूमीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथे जवळपास ५५ नाट्य कंपन्यांच्या माध्यमातून चार जिल्ह्यात नाटकांचे सादरीकरण हाेते. काेराेनामुळे माेजक्याच ठिकाणी नाटके सादर केली जात आहेत. परंतु अन्य कार्यक्रम सर्रास हाेत असल्याने काेराेनाच्या संसर्गाचा धाेका बळावला आहे.
बाॅक्स...
आयाेजकांवर कारवाईच नाही
विशेष म्हणजे, विनापरवानगी नाटक, लग्न साेहळे, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्यांवर तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, पाेलिसांनाही याबाबत कुठल्याही प्रकारचे निर्देश देण्यात आले नाही. सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून काेराेनाचा उद्रेक झाल्यास यास काेण जबाबदार राहणार, असा प्रश्न केला जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अनाधिकृतपणे व नियमांना डावलून गर्दीचे कार्यक्रम घेणाऱ्या आयाेजकांवर कारवाई करावी, अशी मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.