देसाईगंज : प्रत्येक गोष्ट ही कर्मयोगाशी निगडीत आहे. त्यामुळे जीवनात प्रत्येकांनी चांगले कर्म करावे, श्रीमद् भगवत गीता ही वैभवशाली जीवनाची कार्यशाळा आहे, असे प्रतिपादन जयरामदास गहाणे महाराज यांनी केले. श्री साईबाबा मंदिर हनुमान वार्ड येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त २२ ते २८ मार्च दरम्यान श्रीमद् भागवत सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे. सप्ताहाच्या चौथ्या दिवशी आयोजित प्रवचनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना गहाणे महाराज म्हणाले, या चराचर सृष्टीत मानवी जीवन सुखमय करण्यासाठी अज्ञानरूपी घाण, अविचारीरूपी दुर्गूण जोपर्यंत आपण सोडणार नाही. तोपर्यंत अंधारात खितपत पडावे लागेल. आंघोळीने केवळ शरीर स्वच्छ होते. जीवनात चांगले कर्म होण्यासाठी मन स्वच्छ व प्रसन्न राहणे गरजेचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले. भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी कीर्तनकार संच, श्रीसंप्रदाय सेवा समिती, महालक्ष्मी महिला मंडळ व साईबाबा मंदिर सेवा संघाचे कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
जीवनात चांगले कर्म करा
By admin | Updated: March 27, 2015 01:09 IST